राहुल देतोय सर्प जीवदानाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST2021-08-13T04:33:06+5:302021-08-13T04:33:06+5:30
(नागपंचमी सण विशेष ) संजय कुमार बंगळे अर्जुनी मोरगाव : श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल ...

राहुल देतोय सर्प जीवदानाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश ()
(नागपंचमी सण विशेष )
संजय कुमार बंगळे
अर्जुनी मोरगाव : श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना रुजविण्यासाठी हा सण पाळला जाण्याची प्राचीन परंपरा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा आहे. साप ! हा शब्द उच्चारताच अंगावर काटा उभा राहतो. मनाचा थरकाप उडतो. पूर्वापारपासून चालत आलेली सापा बद्दलची अनुवंशिक भीती याला कारणीभूत आहे. सापा बद्दलची अनुवंशिक भीती,शास्त्रीय अज्ञान, व माहितीचा अभाव यामुळे लोक दिसेल त्या सापाला मारून टाकतात. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याला वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास व रक्षणास मदत होते. असा संदेश अर्जुनी मोरगाव परिसरात सर्पमित्र राहुल दर्याव लाडे सापांना जीवदान देऊन देत आहे.
अर्जुनी मोरगाव परिसरात राहुल सर्पमित्र म्हणून सर्वांच्या परिचयाचा आहे. राहुलला तालुक्यातील कोणत्याही गावातून, केव्हाही, रात्री-बेरात्री साप असल्याचा फोन आला की राहुल सापाला पकडण्यासाठी २४ तास आपली सेवा देतो. राहुलची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. त्याचे साकोली रोडवर ट्रॅक्टर दुरुस्तीचे शॉप आहे. आपल्या वडिलांच्या व्यवसायात तो जमेल ती मदत करतो. राहुलचे शिक्षण एम.ए.मराठी, बी.कॉम, आयटीआय पर्यंत झाले असून पुढे त्याला सापांच्या विषयाशी संबंधित पीएचडी करायची आहे, असा मानस त्याने व्यक्त केला. आपल्या उपजीविकेसाठी वर्षातील सहा महिने राहुल जिओलॉजी सर्वे ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या गाडीवर वाहन चालका काम करतो व इतर सहा महिने ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करतो. गेल्या चार वर्षांपासून राहुल पंकज लेंडे या आपल्या मित्रा जवळून प्रेरणा घेऊन सापांना कसे पकडायचे याविषयी प्रशिक्षण घेऊन सापांना जीवदान देण्याचे कार्य करीत आहे.
.........
१५०० सापांना दिले जीवनदान
राहुल मागील चार वर्षात मुकेश पवार या मित्राच्या सहकाऱ्याने जवळपास १५०० सापांना पकडून जीवदान दिले आहे. सापाबद्दल मानवी मनात भीतीचे कारण म्हणजे त्याचे विष. साप चावल्यानंतर तो त्याचे विष सोडतो. अर्जुनी मोरगाव परिसरात धामण, मन्यार, भारतीय नाग, घोणस, तस्कर, मांजऱ्या साप, धोंड्या दिवट, कुकरी कवड्या, अजगर इत्यादी प्रजातीचे साप आढळतात. सापाबद्दल भीती असल्याने नागरिकांनी सापाला मारू नये सर्पमित्रांना बोलवावे, तसेच साप चावल्यास गावठी औषधी उपचार न करता दवाखान्यात जावे. ग्रामीण परिसरातील दवाखान्यात साप चावल्यावर लसीची कमतरता जाणवते.
........
१० प्रजातीचे साप विषारी
महाराष्ट्रामध्ये एकूण ५२ प्रजातीचे साप असून त्यापैकी केवळ १० प्रजातीचे साप विषारी आहे. पावसाळ्यात उंदीर बेडूक,पाली, सरडे अशा प्राण्यांची संख्या व हालचाली वाढत असल्याने त्यांना खाण्यासाठी साप घराजवळ येतात. सापांना लांबी-रुंदी कळते, परंतु जाडी कळत नाही. कारण सापांची दृष्टी द्विमितीय असते. सापाला कान नसतात. त्याला ऐकू येत नाही. सापांना वाचविणे फार गरजेचे आहे. त्यांना न मारता जीवदान दिले पाहिजे.
........
गैरसमज भरपूर
या कार्यात वनविभागाकडून कोणतीही सुरक्षा हमी मिळत नाही. वनविभागाने साप पकडण्याचे परवानगी पत्र द्यावे असे तो म्हणाला. राहुल ने साप पकडण्याची स्टिक स्वतः तयार केली आहे. सापाशी निगडीत अनेक गैरसमज आहेत साप बदला घेतात, सूड पकडतात, गुप्त धनाचे रक्षण करतात ह्या सर्व मानवी मनाच्या कल्पना आहेत.