प्रकल्पात भक्कम पाणीसाठा : बैठकीत होणार क्षेत्राचे नियोजनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत भक्कम पाणीसाठा दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात यंदा रबीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा दिसून येत आहे. रबीसाठी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडले जात असून क्षेत्राचे नियोजन मात्र लवकरच होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीत केले जाणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तवीक जिल्ह्यातील प्रमुख पीक धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे. परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंगी करीत आहे. परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकऱ्यांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे. अशात पाटबंधारे विभागच देव बनून शेतकºयांसाठी धावून आल्याचे दिसून आले व नेहमी विभागाकडून सिंचनाची सोय केली जाते. याचेच फलीत आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आजही पावसाच्या लहरीपणावर नव्हे तर पाटबंधारे विभागाच्या भरवशावर आपली शेती करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात रब्बीचा हंगाम तर पूर्णपणे पाटंबधारे विभागावरच अवलंबून असतो.मागील वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पाटबंधारे विभागाने रब्बीसाठी पाणी दिले नव्हते. यंदा मात्र पावसाने चांगलीच साथ दिल्याने सध्या जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. यामुळे यंदा जिल्ह्यात रब्बीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा दिसत आहे.जिल्ह्यात रब्बीसाठी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडले जाते. सध्या पुजारीटोला प्रकल्पात ६५ टक्के तर इटियाडोह प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा आहे. यावरून या दोन्ही प्रकल्पांतून रब्बीसाठी पाणी सोडले जाणार यात शंका वाटत नाही.मध्यप्रदेश, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यालाही लाभरबीसाठी पुजारीटोला व इटियाडोह प्रकल्पातून सिंचनाची सोय केली जाते. याचा फायदा मात्र लगतच्या मध्यप्रदेश राज्यासह भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील काही भागालाही होतो. त्याचे असे की, पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले असता कालव्यांच्या माध्यमातून ते पाणी सालेकसा, आमगाव व गोंदिया तालुक्यात येत असतानाच मध्यप्रदेश राज्यातील लगतच्या काही भागातही जाते. त्याचप्रकारे, इटियाडोह प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्याला मिळत असतानाच लगतच्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व आरमोरी तालुक्यातही जाते.बैठकीत होणार क्षेत्राचे नियोजनरब्बीसाठी या दोन्ही प्रकल्पांतून किती पाणी सोडायचे हे ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक घेतली जाते. यात जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, आमदार व अन्य जनप्रतिनिधी राहतात. ते बैठकीत ठरवितात व त्यानुसार प्रकल्पांतून पाणी सोडले जाते. प्राप्त माहितीनुसार, पुजारीटोला प्रकल्पातून खरिपासाठी सुमारे २२ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला तर इटियाडोह प्रकल्पातून सुमारे १७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जाते. आता या आधारावर बैठकीत सिंचन क्षेत्र ठरविले जाणार. १५ तारखेनंतर ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. यामुळे त्यानंतरच रब्बीसाठी सिंचन व क्षेत्र हे स्पष्ट होणार.
रबीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM