रबीची लागवड १८ टक्क्यांनी घटणार
By Admin | Updated: January 8, 2015 22:56 IST2015-01-08T22:56:18+5:302015-01-08T22:56:18+5:30
खरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच

रबीची लागवड १८ टक्क्यांनी घटणार
उन्हाळी भातपीक : जिल्ह्यात ३६५ हेक्टरवर रोपवाटिका
देवानंद शहारे - गोंदिया
खरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे रबीचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी घटणार आहे.
मागील वर्षी रबीचे पीक ३५ हजार ४६९ क्षेत्रात घेण्यात आले होते. यंदा वातावरणातील बदल आणि कमी पाऊस यामुळे रबीच्या लागवडक्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे केवळ २८ हजार ९८७ क्षेत्रात रबी पीकाची लागवड होत आहे. यात धानासह भाजीपाला व इतर पिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात उन्हाळी भातपिकाचे सरासरी क्षेत्र सात हजार ९०० हेक्टर आहे. मागील वर्षी १८ हजार २८९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भात पीक घेण्यात आले. तर यावर्षी १६ हजार हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. सध्या जिल्ह्यात ३६५ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची रोपवाटिका लावण्यात आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
यावर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत उन्हाळी भात पिकाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सहा हजार ५०० हेक्टर क्षेत्रात प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये हेक्टरनिहाय क्षेत्र ठरविण्यात आले आहे. या अभियानातून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घेता येईल व त्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा होईल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
सर्वच पिकांच्या
क्षेत्रात घट
गेल्यावर्षीच्या गहू २६६८ हेक्टर, हरभरा ७८४१ हेक्टर, लाख, लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, पोपट आदी १३ हजार ७८० हेक्टर, जवस ८८१२ हेक्टरमध्ये तर मिरची, ऊस, भाजीपाला वगैरे पिके २३६८ हेक्टर क्षेत्रात घेण्यात आले होते. मात्र यावर्षी गहू १४३२ हेक्टर, मका १४३ हेक्टर, हरभरा ६४६६ हेक्टर, लाख-लाखोळी १० हजार २५९ हेक्टर, वाल, वटाणा, चवळी, पोपट व इतर १८३० हेक्टर, जवस ६०९५ हेक्टर क्षेत्रात असे एकूण २६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. याशिवाय ऊस ७८ हेक्टर, ऊस खोडवा ४०६ हेक्टर, भाजीपाला १५९६ हेक्टर, मिरची ५७२ हेक्टर, केळी १२ हेक्टर व टरबूज ७ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकूण २८ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रात सध्याचे रबी पीक घेण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलने यंदा रबीचे क्षेत्र घटल्याचे तब्बल १८ टक्के पीक कमी होणार आहे.