वनांचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज
By Admin | Updated: July 16, 2016 02:14 IST2016-07-16T02:14:03+5:302016-07-16T02:14:03+5:30
जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून

वनांचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज
वृक्षतोड थांबवा : गॅस वाटप कार्यक्रम
इसापूर : जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून पर्यावरण संतुलीत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी केले.
ते खामखुरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी १३ जुलैला गॅस वाटप कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, १ ते ७ जुलैपर्यंत शासनाने पर्यावरण संतुलन सप्ताह राबवून राज्यात २ कोटी वृक्ष लागवड केली आहे. त्यांचे संगोपन करणे आपले कर्तव्य आहे. आजघडीला ग्रामीण भागात इंधन म्हणून जलाऊ लाकडे जंगलातून आणून स्वयंपाक केले जाते. त्या वृक्षतोडीने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे शासनाच्या वतीने अनुदानीत गॅस कनेक्शन वाटप होत आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबवा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी सरपंच संजय राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रसहायक व्ही.जे. दखने, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमेश्वर संग्रामे, शीतल लाडे, परसराम जांभुळकर, रविंद्र मिसार व गणमान्य नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच संजय राऊत यांनी, पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे हे गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबविण्यासाठी त्यांनी आवाहन केले. या वेळी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २९ कनेक्शन तर इतर वर्गाला १८ असे एकूण ४७ गॅस कनेक्शन अनुदानावर वाटप करण्यात आले.
संचालन पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी केले. आभार वन व्यवस्थापन समितीचे सचिव पी.एम. केळवतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)