४५८ जलस्रोतांची कामे पूर्ण २२७ कामे प्रस्तावित
By Admin | Updated: February 2, 2015 23:09 IST2015-02-02T23:09:17+5:302015-02-02T23:09:17+5:30
पाण्याशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही व अन्नाशिवाय जीवन नाही. याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता पाण्याचे स्त्रोत कसे तयार करता येतील,

४५८ जलस्रोतांची कामे पूर्ण २२७ कामे प्रस्तावित
काचेवानी : पाण्याशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही व अन्नाशिवाय जीवन नाही. याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता पाण्याचे स्त्रोत कसे तयार करता येतील, पाणी कसे थांबवता येईल, पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना कशाप्रकारे देता व घेता येईल यासाठी विविध योजना तयार करून त्या क्रियान्वित केल्या. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना खरच मिळाला आणि उत्पादनातही वाढ झाल्याचे या दशकाच्या उत्पादनावरून दिसून येते.
मग्रारोहयो आणि राष्ट्रीय कृषी अभियानांतर्गत अनेक योजना आणि कामे राबविण्यात येत आहेत. जिल्हा पातळीपासून तर ग्रामीण पातळीपर्यंत अनेक विभागामार्फत वेगवेगळी कामे पूर्ण केले जात आहेत. यात कृषी विभाग समाविष्ट आहे. तिरोडा तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना विविध माध्यमातून पाण्याची उपलब्धता व्हावी, अधिक वेळपर्यंत जमिनीत पाणी टिकून रहावे, पाण्याची पातळी वाढावी, गुरांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी अशा अनेक कारणांसाठी सन २००४-०५ ते २०१२-१३ या नऊ वर्षांत ४५८ पाण्याच्या स्त्रोतांची कामे पूर्ण केली आहेत. सन २०१४-१५ साठी २२७ कामे प्रस्तावित करण्यात आले असून त्यांना पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न केले जाईल, असे तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे यांनी सांगितले.
तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत मग्रारोहयो आणि राष्ट्रीय कृषी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये शेततळे १७४, बोडी खोलीकरण कामे १३६, सिनाबा (सिमेंट नाला बांध) १३३ आणि अन्य १५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २०११-१२ या वर्षात सर्वाधिक एकूण १४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २००४-०५ या वर्षाला शेततळे (२०), बोडी खोलीकरण (९), सिनाबा (९), २००५-०६ या वर्षामध्ये शेततळे (१७), बोरवेल (८), सिनाबा (२७), मानाबा (३) असे एकूण ५५ कामे पूर्ण करण्यात आले. २००८-०९ मध्ये शेततळे (१०), बोडी खोलीकरण (१३), सिनाबा (११) असे एकूण ३४ कामे पूर्ण करण्यात आले. सन २०१०-११ या आर्थिक वर्षात शेततळे (३८), बोडी खोलीकरण (४९), सिनाबां (३४) आणि मानाबा (८) असे एकूण १२९ कामे पूर्ण करण्यात आले. सन २०११-१२ या आर्थिक वर्षात शेततळे (७७), बोडी खोलीकरण (३९), सिनाबां (३३) व मानाबां (२) असे एकूण १४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
नऊ वर्षातून चार वर्षे वगळता पाच वर्षांत एकूण शेततळे (१७४), बोडी खोलीकरण (१३६), सिनाबां (१३३) आणि मानाबां (१५) असे ४५८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांतून शेतीला तसेच मानवी समस्येला पाण्याचा आधार मिळाला. यातून शेतकऱ्यांसह इतर प्राण्यांना पाण्याची उपलब्धता प्राप्त झाली. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादनात भर पडली, असे कृषी विभागाने सांगितले आहे. (वार्ताहर)