समस्यांनी ग्रस्त दवनीवाडा अविकसितच
By Admin | Updated: May 30, 2015 01:20 IST2015-05-30T01:20:56+5:302015-05-30T01:20:56+5:30
इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे.

समस्यांनी ग्रस्त दवनीवाडा अविकसितच
गोंदिया : इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे. कोणत्याही प्रकारे विकास झाला नसून त्याकडे राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अनेक समस्यांशी आजही हे गाव झुंझ देत आहे.
मागील ३० वर्षांपासून दवनीवाडा जिल्हा परिषद क्षेत्र होते. परंतु जिल्हा परिषदेत ५२ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र वाढविण्यात आले. दवनीवाडा क्षेत्र तोडून नव्याने धापेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र बनविण्यात आले. तर दवनीवाडाला रतनारा जिल्हा परिषद क्षेत्र नाव देण्यात आले. दवनीवाडा क्षेत्रातील वळद, खातीटोला, झाडुटोला हे गाव कमी करण्यात आले होते. परंतु दवनीवाडा येथील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना केवळ वळद गावाला दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट गाव महालगाव, मुरदाडा, लोधीटोला, धापेवाडा, नवेगाव, देवरी मिळून धापेवाडाला वेगळे जिल्हा परिषद क्षेत्र केले. तर दवनीवाडा जुने क्षेत्र असून रतनारा या मोठ्या गावाला त्यात समाविष्ट करून रतनारा गावाला वेगळे जि.प. क्षेत्र बनविण्यात आले.
येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत दवनीवाडा क्षेत्र बदलले. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यात सांगण्यात आले की, दवनीवाडा क्षेत्र बदलून रतनारा नावाने दिलेल्या क्षेत्रात दवनीवाडा गावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे गाव विविध योजनांपासून वंचित राहणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा बहिष्कार करू, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र तेच आता एकीकडे बहिष्कार तर दुसरीकडे जि.प. महिला राखीव उमेवारीसाठी गावोगावी फिरत आहेत. दवनीवाडा येथे राकाँ, काँग्रेसकडून जि.प. महिला उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांचे सोंग पुढे येत आहे.
तिरोडा व गोंदिया या दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी दवनीवाडा गाव असून गोंदिया तालुक्यात मोडते. विधानसभा क्षेत्र तिरोडा असून संभावित नवनिर्माण दवनीवाडा तालुक्यात तिरोडा-गोंदिया तालुक्यातील एकूण ६५ गावांचा समावेश राहणार आहे. येथे २५ वर्षांपूर्वी तालुका निर्माण समिती गठित करण्यात आली. यात अध्यक्ष आसाराम कटरे, सचिव जे.बी. मंद्रेले, डॉ. ललन पांडे, मुन्नालाल चौधरी, विष्णू दोनोडे, शफी शेख, टेकचंद लिल्हारे, माधोराव भोयर आदींचा समावेश होता. सदर समितीमार्फत विधानसभेत दवनीवाडाला तालुका बनविण्याचा नियमित पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री तसेच शासनाचे सचिव यांनी दवनीवाडाला तालुका बनविण्याच्या मागणीला सिफारस देवून सहमती दर्शविली. परंतु काही वर्षांपूर्वी समितीचे अध्यक्ष, सचिव व सहसचिव यांचा मृत्यू झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली नाही. नवीन अध्यक्ष, सचिव व सदस्य केवळ कागदोपत्री मर्यादित आहेत.
त्यामुळे सदर समितीच आता मृतावस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे तालुका बनविण्याच्या मागणीलाच विराम लागल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)