प्रेमचंद पटले यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 21:46 IST2018-06-21T21:46:35+5:302018-06-21T21:46:35+5:30
श्रावणबाळ योजनेंतर्गत सुरु असलेली वृद्धापकाळ पेंशन काही गावकऱ्यांनी तक्रार केल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

प्रेमचंद पटले यांचे उपोषण मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : श्रावणबाळ योजनेंतर्गत सुरु असलेली वृद्धापकाळ पेंशन काही गावकऱ्यांनी तक्रार केल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. तसेच २१ जूनला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. अखेर स्थानिक प्रशासनाने तडकाफडकी पेंशन मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पटले यांनी उपोषण मागे घेतले.
तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष इसराज बहेकार यांना पाचारण करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. बहेकार यांनी पटले यांचे प्रकरण २८ जूनच्या सभेत मंजूर करण्याचे आश्वासन दिले. गावातील पदाधिकाºयांनी निंबू पाणी पाजून उपोषण सोडायला लावले.
बोदलबोडी येथील प्रेमचंद पटले यांचे वय ६५ वर्षे असून त्यांनी वृध्दपकाळ पेंशन योजनेसाठी अर्ज केला होता. तहसील कार्यालयात त्यांचे प्रकरण मंजूर करुन श्रावणबाळ योजनेंतर्गत त्यांना दरमहा ६०० रुपये पेंशन मिळण्यास सुरूवात झाली. मात्र काही महिन्यांनी गावातील ४० ते ५० व्यक्तींनी प्रेमचंद पटले हे नियमबाह्यपणे पेंशन योजनेचा लाभ घेत असल्याची तक्रार तहसील कार्यालयाकडे केली. पटले यांच्या नावावर पाच एकर शेती असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची पेंशन बंद करण्यात आली होती. परिणामी पटले यांनी पेंशन पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीला घेवून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाºयांना बोलावून यावर गुरूवारी (दि.२०) तोडगा काढण्यात आला.
आपल्यावरील आरोप बिनबुडाचे- बहेकार
प्रेमचंद पटले यांची पेंशन बंद झाल्यामुळे काही लोकांनी समिती अध्यक्ष इसराम बहेकार यांनी बंद केल्याचा आरोप केला होता. ते सर्व आरोप खोटे असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बहेकार यांनी दिली. आपण बोदलबोडी गावचे रहिवासी असून काही लोकांनी आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. पटले यांची तक्रार गावकऱ्यांनी तहसील कार्यालयात केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी चौकशी करुन पेंशन बंद केली होती, असे सांगितले.