३०० विद्यार्थ्यांना स्पर्धापूर्व मार्गदर्शन
By Admin | Updated: May 5, 2016 01:52 IST2016-05-05T01:52:41+5:302016-05-05T01:52:41+5:30
जिल्ह्याच्या पूर्वी टोकावर असलेल्या आदिवासी व मागासलेला तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा येथे ...

३०० विद्यार्थ्यांना स्पर्धापूर्व मार्गदर्शन
पालकांचाही सहभाग : सालेकसातील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सालेकसा : जिल्ह्याच्या पूर्वी टोकावर असलेल्या आदिवासी व मागासलेला तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा येथे स्पर्धापूर्व मार्गदर्शन शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. मागासलेल्या तालुक्याचा मुलगा किंवा मुलगीसुद्धा आपल्या कला गुणांच्या आधारावर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन उच्च पदावर जाऊन समाजसेवा, देशसेवा करण्याची संधी प्राप्त करावी या हेतूने आयोजित केलेला सदर कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाल्याचे विचार सर्वच व्यक्त करताना दिसले.
कॉम्प्युटर एज्युकेशन सालेकसा, एसीड संस्था सालेकसा आणि स्पर्धापूर्व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दहावी व बारावीनंतर काय?’ या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
उद्घाटन पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांच्या हस्ते, तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, सहायक पोलीस निरीक्षक एच.एम. ननावरे, पोलीस उपनिरीक्षक वजगडे, उपसरपंच हरजीत कौर भाटिया, एसीडचे संचालक आर.ए. रामटेके व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील करिअर मोटिव्हेशनल स्पीकर प्रा. नरेंद्र भुसारी, माय करिअर विकलीचे मुख्य काऊंसिलिंग आॅफीसर प्रा. राहुल खलटकर, लाखनी येथील व्हिजन अॅकेडमीचे संचालक प्रा. रेवाराम खोब्रागडे, डॉ. सुरेश खोब्रागडे, जिल्हा समुपदेशक प्रा. मिलिंद रंगारी, एम.के.सी.एल. चे एस.बी.यू. संदीप सूर्यवंशी, सुहास खरे, विशाल डहाट उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलित करुन माल्यार्पण करण्यात आले व आदरांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत आणि मनोगत घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष, उद्घाटक व अतिथींनी काही विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरे घेत आपले मनोगत व्यक्त केले व उद्बोधन करीत स्पर्धेत उतरण्यासाठी कोणती तयारी व कोणता त्याग करावा लागतो, याबद्दल सांगितले.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. नरेंद्र भुसारी यांनी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरुवात केली. आपापल्या भविष्याबद्दल करिअर घडविण्यासाठी मार्गदर्शन घेण्याची प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिसत असलेली पाहून प्रा. भुसारी यांनी अनेक गरीब जिज्ञासू मुलांचे प्रेरणादायी उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले की, काही मुलांनी गरिबी व अभावाचे चटके सहन करीत ध्येय प्राप्तीसाठी अनेक अडचणींवर मात करीत यशाच्या पायरीवर पाऊल ठेवून शिखर गाठण्याचा प्रयत्न केला. यात ते अनेकवेळा कोसळले, पडले तरी न खचता शेवटी शिखर गाठला. ते आज उच्च पदावर काम करीत सेवा क्षेत्रात महत्वाच्या जवाबदाऱ्या पार पाडत आहेत.
प्रास्ताविक प्रा. गणेश भदाडे यांनी मांडले व मार्गदर्शन केंद्राचे महत्व पटवून दिले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. विजय मानकर यांनी केले. शिबिरासाठी आयोजक चमूतील ग्लोब कॉम्प्युटरचे मधुकर हरिणखेडे, एसीड संस्थेचे राजकुमार रामटेके, लोकमत तालुका प्रतिनिधी विजय मानकर, लोकमत समाचार तालुका प्रतिनिधी गणेश भदाडे, शिक्षक राजकुमार बसोने, ग्रा.पं. सदस्य ब्रजभूषण बैस, डी.एम. हरिणखेडे, नीरज अग्निहोत्री, मनीष शर्मा, सीमा बैस, सीमा हरिणखेडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
मार्गदर्शनातून युवा वर्ग झाला प्रभावित
भुसारी यांनी मनोरंजनात्मकरीत्या मुलांना व मुलींना सचेत करीत व जीवनाचे महत्व सांगत खोटे काय व खरे काय, याचा फरक सांगत अनेक प्रकारच्या संधीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रोजेक्टरच्या मदतीने अनेक क्षेत्राची माहिती देत दहावी व बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात कसे जाता येईल, याबद्दल सविस्तर समजावून सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, त्यासाठी कोणती पत्थे पाळावित, याविषयी माहिती सांगितली.
आपल्या तीन तासांच्या मार्गदर्शनात ज्ञानाचे दार उघडून दिलेल्या त्यांच्या मार्गदर्शनाला मुलामुलींनी एकचित्त होऊन ऐकून घेत उत्तम प्रतिसाद दिला. मुलांचा प्रतिसाद बघून सर्व मार्गदर्शकांमध्ये उत्साहात दिसून येत होता. जन्मापासून पोलिओ ग्रस्त असलेले राहुल खलटकर यांनी आपल्या जीवनात कशी भरारी घेतली, याचे आत्मकथन करताना त्यांचे मार्गदर्शन मनस्पर्शी ठरताना दिसून आले. प्रा. खोब्रागडे यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे सादर करीत दृढसंकल्प केल्यास काहीही अशक्य नाही, असे सिद्ध करणारे मार्गदर्शन केले.