वीज गळतीचे प्रमाण ३४ टक्के
By Admin | Updated: October 17, 2015 02:22 IST2015-10-17T02:22:43+5:302015-10-17T02:22:43+5:30
गोंदिया शहरात वीज चोरीमुळे मोठ्या प्रमाणात विजेची तूट येत आहे. सद्यस्थितीत ३४ टक्के वीजेची गळती सुरू असून ...

वीज गळतीचे प्रमाण ३४ टक्के
तूट ग्राहकांच्या माथी : शहरात लागणार १९ हजार ‘आयआर’ मीटर
गोंदिया : गोंदिया शहरात वीज चोरीमुळे मोठ्या प्रमाणात विजेची तूट येत आहे. सद्यस्थितीत ३४ टक्के वीजेची गळती सुरू असून ही तूट भरून काढण्यासाठी सर्वसामान्य वीज ग्राहकांना भुर्दंड देत त्यांच्या बिलातून ही रक्कम वसूल केली जात आहे. प्रत्यक्षात वापरलेल्या वीजेशिवाय विविध शुल्काच्या नावाखाली ही ३४ टक्के तूट भरून काढणे सुरू असल्यामुळे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याच्या या प्रकाराबद्दल असंतोष व्यक्त केला जात आहे.
वीज ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या युनीटनुसार टप्प्याटप्प्याने वीज बिल वाढत जाते. त्यामुळे जितके जास्त युनिट वापरले तेवढे विजेचे दर वाढत जातात. त्यानुसार ग्राहकाला वीज दराचा जो टप्पा लागू पडेल त्यानुसार जेवढे युनिट वीज वापरली त्याचे शुल्क (वीज आकार) वसूल करण्याचा वीज कंपनीचा हक्क आहे. मात्र स्थिर आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार अशा विविध नावाखाली प्रत्येक ग्राहकाकडून अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. जितकी विजेची तूट जास्त तितका हा अतिरिक्त भुर्दंड वाढत जातो.
वीज चोरीला आळा घालण्यासाठी शहरात इन्फ्रारेड मीटर लावले जाणार आहेत. या मीटरचे रिडिंग मशीनद्वारे घेतले जाणार आहे. या मीटरमध्ये कोणत्याही ग्राहकाने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्या मिटरमध्ये पाचपट अधिक आकडे पडणार आहेत.
त्या अधिकच्या रिडींगनुसार अधिक बील येईल. ते बिल घेऊन ग्राहक तक्रार करण्यास गेल्यास त्याने विद्युत चोरी करण्याचा प्रयत्न कसा केला याबाबत त्याला सूचना दिली जाणार आहे. पुन्हा असे कृत्य केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. (तालुका प्रतिनिधी)
...म्हणून वाढले वीज चोरीचे प्रमाण
वीज चोरीवर आळा घालण्यासाठी वीज वितरण कंपनीने गतिमान विकास योजनेंतर्गत गोंदिया शहरात १९ हजार आय.आर. (इंफ्रा रेड) मीटर लावण्याचे वीज वितरण कंपनीने ठरविले आहे. वास्तविक गोंदिया शहरात २९ हजार आयआर मीटर दोन वर्षापूर्वीच लावायचे होते. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे कसलेही लक्ष दिले नाही. त्यानंतर सर्व जिल्ह्यात हे आयआर मीटर लागल्यानंतर गोंदिया शहरातही २९ हजारापैकी १० हजार मीटर लावण्यात आले. परंतु १९ हजार मिटर लागलेच नव्हते. त्यामुळेच शहरात वीज चोरीचे प्रमाण वाढले. हे सर्व मीटर लागल्यानंतर वीज गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर येऊ शकते, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वीज चोरट्यांवर कारवाईच नाही
गोंदिया शहरात मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणे, आकडे टाकून वीज चोरी करणे याशिवाय उद्योजकांकडून वीज चोरी होण्याचे प्रकार सर्रास घडत आहे. यामुळेच गोंदियात वीज गळतीचे प्रमाण ३४ टक्के आहे. मात्र महावितरणच्या संबंधित पथकाकडून कोणावरही कारवाई होत नाही. याचे रहस्य अद्यापही अनेकांना कळलेले नाही. वीज चोरांच्या या प्रतापाचा भुर्दंड मात्र अतिरिक्त शुल्कांद्वारे सामान्य ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जात आहे.