धान खरेदीत शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: May 22, 2016 01:36 IST2016-05-22T01:36:33+5:302016-05-22T01:36:33+5:30
गैरप्रकार थांबवा : शेतकऱ्यांची जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे तक्रार

धान खरेदीत शेतकऱ्यांची लूट
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. मात्र जनप्रतिनिधी व संचालक तोंडाला पट्टी बांधून बसलेले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेमार्फत विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये नवेगावबांध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. सदर केंद्रावर शासनाचे नियम धाब्यावर देवून मनमानीपणे व्यापाऱ्यांशी संगणमत करुन खुलेआम शेतकऱ्यांची लूट होत आहे.
शासनाच्या नियमानुसार धान खरेदी केंद्रावर वजन काटे हे इलेक्ट्रॉनिक्स असायला पाहिजे, पण नवेगावबांध या धान खरेदी केंद्रावर साध्या काट्यानेच धान खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमाल प्रतिकट्टा दीड ते दोन किलोने काटा मारतात. कट्टा हा ४० किलोचा मोजायला पाहिजे पण तो ४२ ते ४३ किलो मोजल्या जाते व काट्या मागे शेतकऱ्यांची २ ते ३ किलोने लूटमार होते. शेतकऱ्यांनी धान आणल्यानंतर त्याला धान ठेवण्याची व्यवस्था, पोच पावती देणे, टोकण देणे, शासनाचे धान खरेदी केंद्राचे नियम पटवून देणे या गोष्टी केल्या जात नाही व शेतकऱ्यांची दिशाभूल करुन व्यापाऱ्यांचे धान वाम मार्गाने रेडीमेट काट्यांमध्ये मोजून आणून गोडावूनमध्ये ठेपल्या जातात.
यावर्षी शेतकऱ्याला उन्हाळी धानाचे उत्पन्न एकरी २० ते २२ क्विंटल झाले, परंतु धान खरेदी केंद्रावर एकरी पंधराच क्विंटल धान खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित धान विकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धान खरेदी केंद्रावर प्राथमिक सुविधा देणे आवश्यक असतात. परंतु साधे थंड पिण्याचे पाणीही केंद्रावर उपलब्ध नाही. शेतकऱ्यांचे धान अस्ताव्यस्त पडलेले आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आलाच तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
नवेगावबांध हे राजकीय वारसा लाभलेले गाव आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या क्षेत्रातील आहे. तसेच माजी आ. दयाराम कापगते हे याच गावचे आहेत. जि.प. सदस्य किशोर तरोणे, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, संचालक रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य कोरेटी अशा अनेक नेत्यांची फौज नवेगावबांधसारख्या ठिकाणी असताना ही गैरव्यवस्था कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हा गैरप्रकार थांबवावा व शेतकऱ्यांची होणारी लूट बंद करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)