धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: June 29, 2015 01:16 IST2015-06-29T01:16:34+5:302015-06-29T01:16:34+5:30
कोरंभीटोला येथील शेतकऱ्यांनी आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी धान आणले असताना कमी वजन दाखविल्याचा प्रकार ...

धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
३० जूनची खरेदी वांद्यात? : धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
अर्जुनी मोरगाव : कोरंभीटोला येथील शेतकऱ्यांनी आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी धान आणले असताना कमी वजन दाखविल्याचा प्रकार येथील खरेदी विक्री संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या केंद्रावर घडला. गोंधळ घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी तडजोड करुन वास्तविक वजन मान्य करून फरकाची नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण धान खरेदीवरच शेतकऱ्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरंभीटोला येथील आठ शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या खरेदी विक्री समितीच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आणले. या धानाचे २५ जून रोजी मोजमाप करण्यात आले. या केंद्रावर बोरकर नामक ग्रेडर असल्याचे सांगण्यात आले. सर्व शेतकऱ्यांनी मिळून सुमारे ११०० कट्टे धान विक्रीसाठी आणले होते. मोजमाप करताना शेतकरी हजर नसल्याचे समितीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.
आणलेल्या धानाचे वजन या शेतकऱ्यांना ठाऊक होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना कमी वजमाच्या पावत्या देण्यात आल्या. या शेतकऱ्यांनी वजना संबंधात ग्रेडरशी वाद घातला. धान खरेदीच्या देखरेखीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी येथे नियुक्त आहेत. त्यांचेकडे तक्रार करण्यात आली. संस्थेचे एक वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा घटनास्थळी आले. त्यांनी या शेतकऱ्यांची समजूत घालून दुसऱ्या दिवशी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.
२६ जून रोजी सकाळी संबंधित शेतकरी व संस्थेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. हमालांच्या चुकीमुळे असा प्रकार घडल्याचे त्यांनी मान्य केले.
शेवटी या वाटाघाटीत क्विंटलमागे चार किलो अतिरिक्त वजन देण्याचे मान्य करण्यात आले. या केंद्रावर तीन दिवसांत धान विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यात उलट संस्थेचेच नुकसान झाल्याचे कर्मचारी सुरेश गंथडे यांनी सांगितले. ४० क्विंटल अतिरिक्त वजनाच्या मोबदल्याच्या पावत्या शेतकऱ्यांना देण्यात आल्या. ही चूक हमालांनी केल्याचे गंथडे यांनी मान्य केले. या अशा प्रकारामुळे संपूर्ण खरेदीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहेत. (तालुका प्रतिनिधी)
इलेक्ट्रॉनिक वजनकाटे ‘शोभेच्या वस्तू’
शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून शेतमालाचे तंतोतंत वजन करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने धान खरेदी करणाऱ्या संस्थांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटे पुरविले. मात्र दरवर्षी साध्या वजनकाट्यावरच मोजमाप केले जाते. अधिकचे धान लाटण्यासाठी धान खरेदी करणाऱ्या संस्था याचा वापर करीत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गोदामात वीज पुरवठा नसतो. हे इलेक्ट्रॉनीक वजनकाटे वारंवार चार्जिंग करावे लागते, यासाठी याचा वापर करीत नसल्याचे कारण धान खरेदी करणाऱ्या संस्थांचे संचालक सांगतात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना गोदामात इलेक्ट्रीक व्यवस्था नसल्याची माहिती असूनही त्यांनी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे कोणत्या हेतूने पुरविले हा संशोधनाचा विषय आहे. खरेदीमधून कमिशन प्राप्तीसाठी तर ही इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याची खरेदी करण्यात आली नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांद्वारे धानमोजणी झाली तर यामधील सावळागोंधळ कमी होईल असे सुज्ञ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अखेरच्या दिवशी खरेदी वांद्यात
रबी धानपिकाचा हंगाम संपुष्टात येत आहे. राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी ३० जून पर्यंत करण्याचे परिपत्रक काढले. शेतकरी आपल्या सोयीनुसार विक्रीसाठी धान खरेदी केंद्रावर आणत आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचा धान घरात पडून आहे. विशिष्ट केंद्रावरच धान खरेदी करण्याची सक्ती केल्यामुळे काही केंद्रावर लांबच लांब रांगा आहेत तर काही ठिकाणी अगदी शुकशुकाट आहे. खरेदी केंद्रावरील लांबच लांब रांगा लक्षात घेता शेतकऱ्यांना केंद्रावरून धान परत तर न्यावे लागणार नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. हे खरेदी केंद्र ३० जून रोजी बंद होणार असल्याने अगदी कमी दिवस उरलेत. शिवाय ३० जून रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने हमाल त्या दिवशी कामावर येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिक्षा करणाऱ्यांची फसगत होऊ शकते. यामुळे शासनाने ही खरेदी आठवड्यापर्यंत वाढविण्याची मागणी केली जात आहे.