आर्थिक संपन्नतेसाठी योजना राबवा
By Admin | Updated: December 22, 2015 02:00 IST2015-12-22T02:00:55+5:302015-12-22T02:00:55+5:30
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची

आर्थिक संपन्नतेसाठी योजना राबवा
गोंदिया : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ज्या योजनांमुळे सुधारता येईल, अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश पालक सचिव पी.एस. मीना यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १९ डिसेंबर रोजी जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ चा आढावा घेताना ते बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मीना पुढे म्हणाले, जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच विविध विकास कामे करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नियोजन करावे. मजुरांना निर्धारित वेळेत त्यांची मजुरी द्यावी. या योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या विहिरींची कामे त्वरित करून विविध घटकातील लाभार्थी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे, असे ते म्हणाले.
कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे. कृषी व वन विभागाने समन्वयातून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करावी असे सांगून मीना म्हणाले, त्यामुळे फळांमधून जीवनसत्व मिळण्यास मदत होईल. ठिबक सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. तसेच सौर कुंपनासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे शेतीसोबतच जंगलाचे संरक्षण होईल. जंगलाचे संरक्षण व संवर्धनासाठी आदिवासी उपयोजनेचा निधी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी वापरता येईल, असेही मीना या वेळी म्हणाले.
या वेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये नोव्हेंबर २०१५ अखेर झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तलावांतील गाळ काढून मत्स्योत्पादनावर भर द्या
४जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या माजी मालगुजारी तलावातील गाळ काढावे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय इमारतींचे बांधकाम करताना कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे. कामाची देखरेख चांगल्याप्रकारे झाली पाहिजे, असे सांगून मीना म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत या तलावांमधून मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मत्स्य सहकारी संस्थांना सहकार्य करावे.