रूग्णांना जिवंतपणीच मरणयातना
By Admin | Updated: June 3, 2016 01:42 IST2016-06-03T01:42:26+5:302016-06-03T01:42:26+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून मौक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य ...

रूग्णांना जिवंतपणीच मरणयातना
शासनाचे दुर्लक्ष : ग्रामीण रूग्णालय रजेगाव येथील प्रकार
रावणवाडी : ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून मौक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केली. मात्र रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना सतत डॉक्टरांची प्रतीक्षाच करावी लागते व रूग्णांना जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागतात.
डॉक्टरांना रूग्णांची काळजी नाही. मग शासन दरमहा ग्रामीण रूग्णालयांवर लाखो रूपयांची उधळपट्टी का करते? असा सवाल रजेगाव परिसराती गोरगरीब जनता करीत आहे. तालुक्यातील लहान रजेगाव येथे शासनाच्या वतीने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रूपयांचा खर्च करून ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन शासनाच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात गाजावाजा करून सदर रूग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. त्याद्वारे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचा औषधोपचार होईल, हा मागे हेतू होता. परंतु या ग्रामीण रूग्णालयाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले असता रूग्णांवर साधे उपचार तर सोडाच येथील डॉक्टर चूलवार रुग्णांसोबत मुक्तपणे अरेरावी करतात. तसेच लहानसहान आजारांवर उपचारासाठी ‘रेफर टू गोंदिया’ करतात. त्यामुळे रूग्ण उपचार करवून घेण्यासाठी या रूग्णालयात जाणे टाळत असल्याचे चित्र दिसून येते. बहुतांश गोरगरीब व्यथीत नागरिक इतरत्र जावून महागड्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार करवून घेत आहेत. रजेगावच्या ग्रामीण रूग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. अग्रवाल यांची नियुक्ती संबंधितांनी केली आहे. मात्र डॉ. अग्रवाल यांचे दर्शनसुद्धा रूग्णांना होत नाही. डॉ. चुलवार यांच्यासह एकूण १८ कर्मचाऱ्यांचा ताफा संबंधित आरोग्य प्रशासनाने ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तैनात केले आहे. या कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभाग महिन्याकाठी लक्षावधी रूपये खर्च करीत आहे. तरी रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर योग्यप्रकारे उपचार केले जात नाही. किरकोळ स्वरूपाच्या आजारांवरही इतरत्र जावून उपचार करवून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून रूग्णांना किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना दिला जातो. अशा परिस्थितीमुळे गरीब गरजू नागरिकांनी उपचार कुठे करावे, अशी समस्या त्यांच्यापुढे उभी ठाकली आहे.
या ग्रामीण परिसरात सर्वात मोठा ग्रामीण रूग्णालय शासनाने बांधला आहे. मात्र योग्य उपचार मिळत नसल्याचे प्रकार आजही घडतच आहेत. परिसरातील जनता हा त्रास आतासुद्धा मुकाट्याने सहन करीत आहे. ग्रामीण रूग्णालयाची मोठी भक्कम इमारत उभी करून त्यात सर्व सोयी सुविधा शासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मात्र या रूग्णालयात रात्रीला आजारी रूग्णांकरिता कसल्याच सोयीसुविधा पुरविण्यात येत नाहीत. कधी काळी लहानमोठी घटना घडलीच तर रूग्णालयात कोणतेही अधिकारी-कर्मचारी उपस्थित मिळतच नाहीत. (वार्ताहर)