राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद दौऱ्यानिमित्त शनिवारी ते जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले होते. या वेळी तिरोडा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, रवीकांत बोपचे, पंचम बिसेन, गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, केवल बघेले, प्रेम रहांगडाले, अजय गौर, ममता बैस, जगदीश बावणथडे, नीता रहांगडाले, मनोज डोंगरे, कैलास पटले, डॉ. अविनाश जायसवाल, जिब्राहिल पठाण, नरेश कुंभारे, प्रभू असाटी, वाय. टी.कटरे,आदी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर कसलीही तमा न बाळगता पुढे यावे, आंदोलन हे जनतेच्या मनात बिंबत असते. म्हणून आपण सत्तेत असोत की नसोत जनतेच्या कामासाठी पुढे येण्यात काहीच गैर नाही. गोंदिया जिल्ह्यात अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्याकरीता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. या जिल्ह्याला खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे खंबीर नेतृत्व लाभले आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार राजेंद्र जैन हे देखील या जिल्ह्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतात. गोंदिया जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पासंदर्भात त्यांनी अवगत करून दिले आहे. प्रलंबित प्रकल्पांना लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्यासंदर्भात आपण पाऊल उचलणार आहोत. काही प्रकल्पांना मंजुरी देण्यात येणार आहे. पक्षसंघटनेच्या बळकटीकरणासाठी तळागाळांतील कार्यकर्ता मागे पडणार नाही, या बाबीची ग्वाही घ्यायला मी आपल्यापर्यंत पोहोचलो आहे. या जिल्ह्यात निवडणुका असल्या तरी राज्यभरात कुठलेही निवडणूक कार्यक्रम नाही. असे असले तरी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे आपले कर्तव्य समजून परिवार संवाद दौरा हाती घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.