धान उत्पादन कमी, खर्र्च जास्त
By Admin | Updated: December 6, 2015 01:53 IST2015-12-06T01:53:59+5:302015-12-06T01:53:59+5:30
गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या ...

धान उत्पादन कमी, खर्र्च जास्त
निसर्गाचा लहरीपणा : शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
मुंडीकोटा : गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी व लागलेला खर्च अधिक झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा परिसरात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. निसर्गाने यावर्षी अवकृपा दाखविली. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. धान उत्पादनासाठी एकरी १६ ते १७ हजार रुपये खर्च झाले. मात्र एकरी पाच ते सात हजार रुपयांचे उत्पादन झाले आहे.
उर्वरित जवळपास १० हजार रुपयांचा तोटा एकरी शेतकऱ्यांना यावर्षी सहन करावा लागला आहे. आपल्या वर्षभरातील नियोजन चुकले. जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. गोंदिया जिल्ह्यात धानाचे मुख्य पीक असून यंदाच्या अत्यल्प पावसामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. कधी अवकर्षण तर कधी निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी पूर्णत: बेजार झाला आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ विद्युत मोटारपंप तसेच सिंचनाची सोय आहे. त्यांना थोडे फार उत्पादन चांगले घेता आले. परंतु मावा तुडतुड्याने हातात येणारे पिक गेले. यावर्षी धानावर गादमाशी, करपा, तुडतुडा, मावा, तोंड्या, अळींचा प्रादुर्भाव होता. या रोगाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून नेला. शेतकऱ्यांनी पिकांना वाचविण्यासाठी अनेकवेळा औषधांची बरेच वेळा फवारणी केली. परंतु फायदा झाला नाही. पुन्हा जैसे थे वैसे अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर निर्माण झाली. अत्यल्प आलेले उत्पादन दिवाळीचा सणासाठी व्यापाराना धान विकावे लागले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कमी भावाने घेऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक केली. नोव्हेंबर महिन्याशेवटी धान खरेदी केंद्र सुरु झाले. पण हे केंद्र कुणासाठी गरीब शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यासाठी असा प्रश्न पडला. व्यापारी वर्गाचा धान फक्त धान खरेदी केंद्रावर दिसत आहे. धानाची चुकारे २ महिने होत नाही. सर्वसाधारण शेतकऱ्यांचा केंद्रावर धान विकण्यासाठी अनेकदिवस नंबर लागत नाही.
शेतकरी चहुबाजूंनी संकटात सापडला आहे. जो दिवस निघतो तो शेतकऱ्यासाठी सारखाच उगवतो. शेतकऱ्यांना आधी मिळालेल्या कर्जानंतर खरीप पिकाच्या भरवशावर कर्जाची उचल केली. ते ही कर्ज एकरी १५ ते १६ हजार रुपये मिळते. अनेक शेतकऱ्यांना कर्जही मिळणे दुरापास्त झाले आहे. नातेवाईक किंवा सावकाराकडून कर्ज व उसनवारी करून पैसा जमवितात. चांगल्या उत्पादनाच्या आशेवर कर्जबाजारी होतात.
शेतकऱ्यांच्या एका एकरातील लागवडीचा विचार केल्यास धानासाठी बियाणे, खते, औषध फवारणी, कापणी, मळणी व अन्य यावर १६ ते १७ हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र उत्पादन ५ ते ७ हजार होते. एका एकरामागे त्यांना १० हजारांचे नुकसान सहन करावा लागत आहे. निसर्गाची अवकृपा तर सावकार व बँकाकडून घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी पूर्णत: संकटात सापडला आहे. कर्ज कसे फेडावे, मुलाबाळाचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह व हंगामात पैसे कोढून आणावा असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची अपेक्षा भंग केली.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासन प्रती तीव्र असंतोष आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची व्यवस्था जाणून हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांवर शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)