शेतकऱ्यांचे धान पीक जळले
By Admin | Updated: April 25, 2016 01:34 IST2016-04-25T01:34:43+5:302016-04-25T01:34:43+5:30
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १५०० हेक्टर क्षेत्रात धान पिके घेतली जात आहेत.

शेतकऱ्यांचे धान पीक जळले
बंसोड यांनी केली पाहणी : अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व भारनियमन जबाबदार
काचेवानी : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १५०० हेक्टर क्षेत्रात धान पिके घेतली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि टेलवर असल्याने तसेच विद्युत विभागाच्या लोडशेंडिंगमुळे शेतकऱ्यांचे धान ऐनवेळी जळल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. माजी आमदार दिलीप बंसोड यांनी शेतात जाऊन धान पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
माजी आ. बंसोड यांनी २३ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजता मांडवी व खुरखुडी गावाच्या शेतात जावून प्रत्यक्ष धान पिकांची पाहणी केली. यावेळी भाऊलाल नागपुरे, विरचंद नागपुरे, अरूण रंगारी, दुर्गाप्रसाद नागपुरे, जगश्याम दमाहे, रामदास नागपुरे, बळीराम ढेंगे, घनश्याम दमाहे, शालीक ढेंगे, हरी ढेंगे, गोविंद दमाहे, लोकचंद बाभरे, अमरसिंह लिल्हारे, शेखर नागपुरे, सरपंच मुन्ना दमाहे उपस्थित होते. या सर्वांनी आपली जमीन व तेथील धानपिकांची समस्या दाखवली.
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने गर्भावस्थेत असणारा धान जळून खाक झालेला आहे. आता पाणी देण्यात आले किंवा मिळाले तरी त्या लोंबी बाहेर येणार नाही. आल्या तरी दाणे लागणार नाही, अशी समस्या मांडवी आणि खुरखुडी येथे अधिक प्रमाणात दिसून आली आहे.
शेतातील धानपिकांची गत दाखविताना शेतकऱ्यांनी सांगितले, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे नियंत्रण व नियोजन नसल्याने टेलवर पाणी पोहचू शकत नाही. जर या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाकडे लक्ष दिले असते, पाणी वाटपाचे नियोजन केले असते तर अशी गंभीर समस्या निर्माण झाली नसती.
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाकडील बेलाटी आणि मुंडीपार कडील मायनरचे गेट काही शेतकरी बंद करतात. त्यामुळे मांडवी व खुरखुडीकडे जाणारे पाणी जात नाही, अशी गंभीर समस्या आहे. काही शेतात २० ते २५ दिवसांपासून पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे शेतातील धानपीक जळले.
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पी.एस. लांजेवार यांचे सहयोग व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे शेतकऱ्यांनी दिलीप बंसोड यांना सांगितले. पाणी वाटपाच्या कामावर कार्यालयाचे पाच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यात भेलावे, आर.एन. गौतम आणि सूर्यवंशी यांचा समावेश आहे. भेलावे आणि गौतम यांच्या निष्काळजीपणामुळे मांडवी आणि खुरखुडीकडे पाणी पोहोचत नसल्याचे सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी पी.एस. लांजेवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न बंसोड यांनी केला. मात्र या अधिकऱ्याने फोन अटेंड केला नाही.
यासंबंधी आपण अधिकाऱ्यांशी बोलणी करू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिला. आदल्या दिवशी लोकमतने शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत शनिवारी पाणी सुरू करण्यात आले होते. मात्र धान जळल्याने त्याचे अस्तित्व दिसून येत नाही. (वार्ताहर)
आठ तास भारनियमन
शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी विद्युत वितरण कंपनी तेवढीच जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी सांगितले, दुपारी ४ वाजतापासून रात्री १२ वाजतापर्यंत लोडशेंडिंग ठेवली जाते. त्यामुळे पुन्हा सुरू केले तर पाणी यायला चार तास लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणता उपाय करावा, हेच समजत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतात भरपूर पाण्याची गरज आहे. अशावेळी लोडशेंडिंग करणे शेतकऱ्यांचे हिताचे नसून आपण वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलणी करू, असे बन्सोड म्हणाले. रात्री १२ वाजतानंतर २ पंप सुरू केले जातात आणि दिवसा तीन पंप सुरू केले जातात, असे प्रकल्पाचे कर्मचारी सूर्यवंशी यांनी सांगितले.
रोजंदारी कामगाराने शेतकऱ्यास मारले
सालेबर्डी येथील रहिवासी व शेतकरी लोकचंद जागो बाभरे याला मायनर नं. ४ आर येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या चार कामगारांपैकी एकाने मारहाण केली. अमरसिंह माधोराव लिल्हारे व शेखर गजानन नागपुरे यांच्यासमोर (दि.२३) दुपारी २ वाजता मारपीट केली. मारणारे रोजंदारी कर्मचारी असून बेलाटी व कवलेवाडा येथील असल्याचे सांगितले. या वेळी माजी आ. दिलीप बंसोड यांनी आर.एन. गौतम यांना दूरध्वनीवरून मारपीट करणारा कामगार कोण? असे विचारले असता उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे बंसोड यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मारपीट करणाऱ्यांची तक्रार पोलिसांत देण्यात यावी, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.