दोन बाधितांनी केली मात, सात ॲक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:01+5:302021-09-09T04:36:01+5:30
गोंदिया : मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत थोडी वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली होती. ...

दोन बाधितांनी केली मात, सात ॲक्टिव्ह
गोंदिया : मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत थोडी वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली होती. मात्र बुधवारी (दि.८) दोन बाधितांनी कोरोनावर मात केल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सात वर आली. तर आठपैकी सहा तालुके कोरोनामुक्त झाले आहे. तर देवरी आणि अर्जुनी मोरगाव या दोनच तालुक्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ७६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४८९९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२९२९२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९७१६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२१० कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०४९९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
.............
८ लाख ३८ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात १२५ केंद्रावरुन लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत ८ लाख ३८ हजार ६७७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
................
कोट
नागरिकांनो नियमांचे करा पालन
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. आपले थोडेही दुर्लक्ष पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणारे ठरु शकते. शिवाय यामुळे आपल्या सण उत्सवांवरसुद्धा विरजन पडू शकते. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करुन काळजी घेण्याची गरज आहे.
- लक्ष्मीचंद रोचवानी, जिल्हा महासचिव व्यापारी असोसिएशन
..............
सण उत्सव सुरळीत पार पाडा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. अशात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तसेच सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी याची अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
- दुलीचंद बुद्धे, सामाजिक कार्यकर्ते.
........................
स्वत:ची आणि कुटुंबीयांची घ्या काळजी
जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असला तरी आपले थोडेही दुर्लक्ष पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणारे ठरु शकते. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्या.
- डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस