वर्षभरात १७ जणांवर केला श्वापदांनी हल्ला
By Admin | Updated: April 8, 2015 01:29 IST2015-04-08T01:29:22+5:302015-04-08T01:29:22+5:30
जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेक प्रकारचे वन्यप्राणी वास्तव्य करतात.

वर्षभरात १७ जणांवर केला श्वापदांनी हल्ला
लोकमत विशेष
देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेक प्रकारचे वन्यप्राणी वास्तव्य करतात. या प्राण्यांपैकी रानडुकरांची धाव नेहमीच गाव आणि गावालगतच्या शेतीकडे असते. फळ, कंद, विविध पिके, भाजीपाला व पाण्यासाठी गावाकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वर्षभरात एकूण १७ मनुष्य जखमी झाल्याची नोंद गोंदिया वनविभागाने घेतली आहे. विशेष म्हणजे सर्व जखमी १७ मनुष्य केवळ रानडुकरांच्याच हल्ल्यात जखमी झाले, पण मृत्यू कुणाचाही झालेला नाही.
गावाबाहेरील लगतच्या जंगलात मोहफुले वेचण्यासाठी जाणारे नागरिक तर कधी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमांवर वन्यप्राणी हल्ले करतात. तर कधी पाण्यासाठी भटकत ते गावापर्यंत येवून पोहचतात. अशात एकतर ग्रामस्थांकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो किंवा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मनुष्य जखमी होतो. शेतामधील पीक किंवा भाजीपाल्याची नासधूस मुख्यत्वे रानडुकरे करतात. अशावेळी राखणदार त्यांच्या हल्ल्यात जखमी होतो. तर कधी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राणी जखमी किंवा ठार होतात.
आर्थिक वर्ष एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जिल्ह्यातील १९ पशुधनाची हानी झाली. पशुधन हानीच्या सदर एकूण १९ प्रकरणांसाठी एक लाख ५८ हजार ७२५ रूपये मंजूर करण्यात आले व ते सदर लाभार्थ्यांना वितरितसुद्धा करण्यात आले. यात विशेष म्हणजे पशुधन हानीच्या लाभाचा एकही प्रकरण प्रलंबित नाही. सर्वच लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.
वनप्राण्यांच्या हल्ल्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढवतो. अशावेळी वनविभागाकडून नुकसान भरपाईल दिली जाते. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतातील पीकहानी झाल्याच्या ५३१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ४२९ प्रकरणातील लाभार्थ्यांना १५ लाख ३५ हजार ८३७ रूपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आली. तर १०२ पीकहानीची प्रकरणे प्रलंबित आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध होताच प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली जातील.
१७ पैकी केवळ चौघांनाच मदत
४रानडुकरांच्या हल्ल्यात जिल्ह्यात वर्षभरात जिल्ह्यात एकूण १७ व्यक्ती जखमी झाले. मात्र मदत केवळ चार जखमींनाच देण्यात आली आहे. सदर चौघा जखमींना एक लाख ६१ हजार ०८५ रूपयांचा नुकसान भरपाईचा लाभ देण्यात आला. मात्र १३ जखमींची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. त्यांना लाभ देण्यासाठी
असे आहे नुकसानभरपाईचे स्वरूप
१६ जानेवारी २०१५ च्या शासन आदेशानुसार वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या इसमाच्या कुटुंबास आठ लाख रूपयांची मदत दिली जाते. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कायम अपंगत्व आल्यास चार लाख रूपये व गंभीर जखमी झाल्यास एक लाख रूपयांची मदत करण्याची तरतूद आहे. याशिवाय किरकोळ जखमींच्या औषधोपचारासाठी १५ हजार रूपयांपर्यंतची तरतूद आहे.