सेंद्रीय शेती अभ्यास दौरा
By Admin | Updated: June 19, 2014 00:08 IST2014-06-19T00:08:53+5:302014-06-19T00:08:53+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कृषी आराखड्यांतर्गत सेंद्रीय शेती कार्यक्रम सन २०१३-१४ मध्ये एकूण १० गावांमध्ये राबविण्यात येत असून सेंद्रीय शेती दौरे केले जात आहेत.

सेंद्रीय शेती अभ्यास दौरा
२५ शेतकऱ्यांचा सहभाग : शेतकऱ्यांनी गिरविले सेंद्रीय शेतीचे धडे
सडक/अर्जुनी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कृषी आराखड्यांतर्गत सेंद्रीय शेती कार्यक्रम सन २०१३-१४ मध्ये एकूण १० गावांमध्ये राबविण्यात येत असून सेंद्रीय शेती दौरे केले जात आहेत.
अन्नपूर्णा कृषी विज्ञान मंडळ खजरी व ग्रामीण बहु. शिक्षण संस्थेच्यावतीने गट समूह संघटन करणे, गांढुळ खत उत्पादन युनीट बांधकाम, बायोडायनामिक कम्पोस्ट, शेतीशाळा व शेतकरी अभ्यास दौरा इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे तसेच किटक नाशकांच्या वापराने जमिनीतील पिकांना आवश्यक असणारे जिवाणू नष्ट होत आहे. परिणामी जमीन सुपीक होण्याऐवजी नापिकीकडे वळत आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती व जैवीक शेतीचे महत्व कळावे यासाठी कृषी विभागातर्फे राज्यांतर्गत २५ शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सेंद्रीय शेती अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांची भेट देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्राला देण्यात आली. अनुसंधान केंद्र देवलापार येथे शेतकऱ्यांना गोबर गॅस, जीवामृत, बीजामृत, गांडूळ खत, अमृतपाणी व शेण आणि गोमूत्र यापासून बनविलेल्या विविध औषधी बाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करून जमीनीचे आरोग्य टिकवावे. किटकनाशकांचा अति वापर टाळून पिकांवर व माणवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळून पोषक पिक काढण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एफ.आर.टी.शहा यांनी केले.
अभ्यास दौऱ्यात संस्थेचे सचिव माधुरी पाथोडे, कृषीमित्र पुष्पमाला बडोले, कृषी सहाय्यक आर.एच.मेश्राम, प्रकाश साखरे, अमीत बडोले, मुरलीधर राऊत, रविंद्र मंडारी, माधोराव सोनवाने, गीता पटले इत्यादी २५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. तालुका कृषी अधिकारी पेशट्टीवार यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी एफ.आर.टी.शहा यांनी दौऱ्याचे यशस्वी आयोजन केले. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्यात उपस्थित शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती संबंधी अभ्यास करून त्यात आवड दाखविली. याचा नक्कीच पुढे लाभ मिळणार असल्याचे मत पेशट्टीवर यांनी व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)