म्युनिसिपल गोविंदपूर शाळेत कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी
By Admin | Updated: December 6, 2014 01:51 IST2014-12-06T01:51:23+5:302014-12-06T01:51:23+5:30
सन २०१४-१५ मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यातील ५० शाळांची प्रायोगिक तत्वावर निवड केली आहे.

म्युनिसिपल गोविंदपूर शाळेत कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी
गोंदिया : सन २०१४-१५ मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यातील ५० शाळांची प्रायोगिक तत्वावर निवड केली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील पाच तर गोंदिया शहरातील नगर परिषदेच्या तीन शाळांचा समावेश आहे. या म्युनिसिपल शाळेतून आता विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे नवीन परिपत्रक नोव्हेंबर २०१४ नुसार, विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याच्या हेतूने इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमातील व्दितीय भाषेचे पाठ्यपुस्तक वगळून त्याऐवजी व्यावसायिक व तंत्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. सन २०१४-१५ करिता शासनाने प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील ५० शाळांची निवड केलेली आहे.
यामधून गोंदिया जिल्ह्यातील पाच शाळा असून गोंदिया शहरातील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मनोहर म्युनिसिपल हॉयर सेकंडरी स्कूल व म्युनिसिपल माताटोली हायस्कूल या तीन नगर परिषद शाळांची निवड शासनाने प्रायोगिक तत्त्वावर केली आहे. ही गोंदियासाठी गौरवास्पद बाब आहे. त्यामुळे म्युनिसिपल शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून कौशल्यपूर्ण तंत्रशिक्षण घेण्यची सुवर्ण संधी मिळणार आहे. हे नि:शुल्क व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी म्युनिसिपल शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे, असे आवाहन शासनाच्या वतीने पालकांना करण्यात आले आहे.
पालकांना माहती देण्याच्या उद्देशाने मनोहर म्युनिसिपल हायस्कूल गोविंदपूर येथे शुक्रवारी ५ डिसेंबरला पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ व शाळा व्यवस्थापन समिती यांची संयुक्त सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही.एम. शर्मा होते. तर पर्यवेक्षक ए.सी. तिवारी, एस.डी. फुंडे, ए.जी. ब्राह्मण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व पालकांची उपस्थित लक्षणीय होती. सभेत मुख्याध्यापक व्ही.एम. शर्मा यांनी परिपत्रकानुसार इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कौशल्यपूर्ण तंत्रज्ञान शिक्षणाची तोंडी ओळख दिली.
ते म्हणाले की, मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर आधारित प्रकल्पातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची ओळख होेते. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी, आत्मनिर्भर व्हावे, विविध कौशल्य आत्मसात व्हावीत या दृष्टीने हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. पर्यवेक्षक ए.सी. तिवारी म्हणाले की, ऐकलेले विसरले जाते, वाचलेले लक्षात राहते आणि केलेले समजते, हे तत्व सर्वमान्य आहे. या तत्त्वावरच सदर अभ्यासक्रम आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वयंपूर्ण होऊन स्वत:चा लहान-मोठा उद्योग उभारू शकतील. शाळेतले शिक्षण हे फक्त चार भिंतीत मर्यादीत न राहता ते आजूबाजूच्या समाजाशी कसे जोडले जाऊ शकते, याचे हे अभ्यासक्रम उत्तम उदाहरण आहे. यावेळी काही पालकांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षकवृंद बी.एस. पटले, आर.एस. पटले, आर.ई. डिसुजा, के.के. पखाले, के.जे. शेख, वीना बिसेन, दुर्गा भदाडे, एम.एम. नेरलवार, ए.एन. भेंडारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षक बी.एस. पटले यांनी केले. (प्रतिनिधी)