फक्त ३८.८६ टक्केच मतदान
By Admin | Updated: May 30, 2016 01:34 IST2016-05-30T01:34:01+5:302016-05-30T01:34:01+5:30
अवघ्या शहराचे लक्ष लागून असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणुकीप्रती मतदारांत निरू त्साह दिसून आला.

फक्त ३८.८६ टक्केच मतदान
गोंदिया : अवघ्या शहराचे लक्ष लागून असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणुकीप्रती मतदारांत निरू त्साह दिसून आला. परिणामी या पोटनिवडणुकीत फक्त ३८.८६ टक्केच मतदान करण्यात आले. उन्हामुळे दिवसा मतदानासाठी मतदार बाहेर निघाले नसल्याचे दिसले. तर सायंकाळी मात्र मतदानात भर पडल्याचेही दिसून आले व त्यामुळेच १२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. रिंगणात असलेल्या सहा उमेदवारांचे भाग्य अखेर पेटीत बंद झाले.
शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल पांडे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यांतर्गत रविवारी (दि.२९) मतदान घेण्यात आले. यासाठी प्रभागातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १ ते ४, जेठाभाई माणिकलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुख्य शाखेत ५ ते ८, सरस्वती महिला विद्यालयात ९ व १० आणि नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात ११ ते १३ असे एकूण १३ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते.
या पोटनिवडणुकीत एकूण १३ हजार १६७ मतदारांना मतदानाचा हक्क बजावयाचा होता. तर रिक्त झालेली ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी रिंगणात असलेल्या प्रभागात राष्ट्रीय पक्षांपासून ते अपक्ष उमेदवारांनीही चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे अवघ्या शहराचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागून आहे. तर मदतानाला घेऊनही शहरवासीयांना उत्सुकता होती. मात्र फक्त ३८.८६ टक्केच मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. यावरून मतदारांचा निरूत्साह दिसून आला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
शिवाय कडक उन्हामुळेही मतदारांनी घराबाहेर निघणे टाळल्याचे कमी झालेल्या मतदानासाठी म्हणता येईल. विशेष म्हणजे झालेल्या मतदानांतर्गत सायंकाळी ३.३० ते ५.३० च्या राऊंडमध्ये १२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. पोटनिवडणुकीतील या मतदानातंर्गत प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. विशेष म्हणजे पोलीस विभागाचे अधिकारीही सातत्याने केंद्रांवर नजर ठेवून असल्याचेही दिसले. त्यामुळे शांततेत मतदान पार पडले. शिवाय अन्य काही तांत्रीक अडचणीही आल्या नसल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
अशी आहे मतदानाची टक्केवारी
मतदानांतर्गत संत तुकाराम महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १ वर ४०.४० टक्के, केंद्र क्रमांक २ वर ४४.५२ टक्के, केंद्र क्रमांक ३ वर ३७.२२ टक्के, केंद्र क्रमांक ४ वर ३८.५२ टक्के, जेठाभाई माणिकलाल हायस्कूलमधील केंद्र क्रमांक ५ वर ४०.४१ टक्के, केंद्र ६ वर ३९.८९ टक्के, केंद्र क्रमांक ७ वर ४०.३५ टक्के, केंद्र क्रमांक ८ वर ३४.६२ टक्के, सरस्वती विद्यालयातील केंद्र क्रमांक ९ वर ४३.२७ टक्के, केंद्र क्रमांक १० वर ३८.०१ टक्के तर नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील केंद्र क्रमांक ११ वर ४६.३८ टक्के, केंद्र क्रमांक १२ वर २७.९२ टक्के व केंद्र क्रमांक १३ वर ३५. ४६ टक्के मतदान झाले.
नमाद महाविद्यालयात सर्वाधिक मतदान
१३ केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानातंर्गत नमाद महाविद्यालयात देण्यात आलेल्या मतदान केंद्र क्रमांक ११ वर सर्वाधीक ४६.७८ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १२ वरच सर्वात कमी २७.९२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे.
मतमोजणीकडे लागले लक्ष
पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.३०) सकाळी १० वाजतापासून हिंदी टाऊन स्कूल परिसरातील स्वर्ण जयंती इमारतीत घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपली जागा कायम ठेवता येते की नाही. शिवाय कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असून सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.