दहावीतही मुलींनीच मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:40 IST2016-06-07T07:40:08+5:302016-06-07T07:40:08+5:30
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या यावर्षीच्या दहावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ८८.२३ टक्के निकाल देऊन

दहावीतही मुलींनीच मारली बाजी
गोंदिया : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या यावर्षीच्या दहावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ८८.२३ टक्के निकाल देऊन नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावले. विवेक मंदिर स्कूलच्या चंचल अजय अग्रवाल हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. सोबतच अर्जुनी मोरगावच्या जेएमबी हायस्कूलची सावी उल्हास धाडेगोणे हिने ९७.०० तर सौंदड येथील लोहिया हायस्कूलच्या पारितोष राखडे याने ९६.८० टक्के गुण घेऊन तृतीय स्थान पटकावले आहे. तिघांच्याही गुणांमध्ये केवळ एक-एक गुणांचा फरक आहे.
जिल्ह्यातून यावर्षी २३ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २० हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ४०७१ प्रावीण्य श्रेणीत, ९३०३ प्रथम श्रेणीत तर ६४८५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. ९०.३८ टक्के मुलींनी बाजी मारली तर मुले ८६.१८ टक्के उत्तीर्ण झाली आहेत.
जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर दोन मुलींनी स्थान पटकावले आहे. त्यात विवेक मंदीर शाळेच्या वैशाली गिरी (९६.६० टक्के) व प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या वैशाली बालपांडे (९६.६०) यांचा समावेश आहे. सर्वात चांगला निकाल देवरी व सडक अर्जुनी तालुक्यांनी दिला आहे. या तालुक्यातील ९० टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
गोंदिया जिल्ह्यातील ३०५ शाळांपैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात बहुतांश शाळा गोंदिया शहरातील आहेत. याशिवाय दोन अनुसूचि जाती मुले व मुलींच्या निवासी शाळा आणि दोन आश्रमशाळांचाही समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गोंदिया तालुक्यातून ९० शाळांचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर सर्वात कमी सालेकसा तालुक्यातील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. सर्वच तालुक्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)