महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST2021-09-15T04:34:39+5:302021-09-15T04:34:39+5:30
गोंदिया : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज, बुधवारी राज्यभर आंदोलन ...

महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला
गोंदिया : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज, बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी मंगळवारी (दि.१४) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला खा. सुनील मेंढे, आ. विजय रहांगडाले, माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी आ. रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, मदन पटले, ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य चामेश्वर गहाने, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, राजेश चतुर, खुमेन्द्र मेंढे, गजेंद्र फुंडे उपस्थित होते. मानकर म्हणाले, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही मानकर यांनी केली. गेली सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भाजपच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.
...........
पटोले यांचा आरोपांचा खुलासा करा
सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकीलच उभा केला नाही, असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधि व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपांवर खुलासा करावा, अशी मागणीही मानकर यांनी केला.
...........