ओबीसींचे जिल्हा अधिवेशन
By Admin | Updated: March 12, 2017 00:22 IST2017-03-12T00:22:42+5:302017-03-12T00:22:42+5:30
आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ

ओबीसींचे जिल्हा अधिवेशन
सिरपूरबांध : आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ व संघर्ष कृती समितीच्या वतीने संयुक्त जिल्हा अधिवेशनाचे आयोजन देवरी येथे करण्यात आले होते. यामध्ये ओबीसी समाजातील लोक अधिक संख्येत उपस्थित होते.
या जिल्हा अधिवेशनाअंतर्गत ओबीसी वर्गातर्फे काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करून शेतकरी व शेतमजुरांच्या विकासाकरीता अर्थसंकल्पात लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद करण्यात यावी, पदोन्नतीतील प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे, लोकसंख्या निहाय प्रतिनिधीत्व देण्यात यावे, तामिलनाडू राज्याप्रमाणे असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करणे, बिहार राज्याप्रमाणे शैक्षणिक भत्ता लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वस्तीगृह व आश्रमशाळा सुरू करणे, ओबीसी स्वतंत्र मतदारसंघ व मंत्रालय निर्माण करण्यात यावे, रेल्वे बजेटप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतंत्र बजेट देण्यात यावे, मंडल आयोग वनाची अप्पन समितीच्या शिफारशी लागू करणे अशा प्रकारे विविध मागण्या ठेवण्यात आल्या होत्या.
या अधिवेशनाप्रसंगी प्रथम सत्रात जातीनिहाय जनगणनेशिवाय ओबीसी मंत्रालय अर्थपूर्ण की अर्थहीन या विषयानुसार उद्घाटक इंजि. संजय मगर यांनी माहिती दिली. चेतन उईके म्हणाले की, जोपर्यंत एसटी,एससी, ओबीसी हे एकत्र येवून लढा देत नाही तो पर्यंत शासनावर दबाव निर्माण होणार नाही. सत्राध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी ओबीसी कार्यकर्ता व जनतेला मार्गदर्शन केले.
ओबीसीं शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? या प्रबोधन सत्राचे मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब गावंडे, प्रमुख अतिथी म्हणून सुमन बिसेन, सविता बेदरकर, अमर वऱ्हाडे, राजेश चांदेवार, सावन कटरे,संजय दरवडे व बबलू कटरे यांनी चर्चा घडवून आणली. (वार्ताहर)