प्रतिसादाअभावी मुक्कामी फेऱ्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:17+5:302021-07-31T04:29:17+5:30

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीची चाके थांबलेली होती. आता परिस्थिती नियंत्रणात ...

The number of round trips decreased due to lack of response | प्रतिसादाअभावी मुक्कामी फेऱ्यांची संख्या घटली

प्रतिसादाअभावी मुक्कामी फेऱ्यांची संख्या घटली

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीची चाके थांबलेली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे प्रवासाला परवानगी देण्यात आली असून पुन्हा एसटी प्रवासी सेवेत रस्त्यावर उतरली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनी प्रवास टाळला असून कोठे जायचे असल्यास स्वत:च्या खासगी वाहनानेच जाण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी आजही एसटीला पाहिजे तेवढा प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. उलट फेऱ्या चालवून डिझेलचा खर्चही निघत नसल्याने आगारांनी आजही कित्येक फेऱ्या बंदच ठेवल्या आहेत. यामध्ये मुक्कामी असलेल्या फेऱ्यांचाही समावेश आहे. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत असून जनजीवन पुन्हा सुरळीत होत असल्याने मुक्कामी फेऱ्या बंद असलेल्या गावातील नागरिकांची गैरसोय होतानाही दिसत आहे.

---------------------------

आगार आणि मुक्कामी गावी थांबणाऱ्या बसेस

आगार कोरोनापूर्वी मुक्कामी थांबणाऱ्या बसेस सध्या मुक्कामी थांबणाऱ्या बसेस

गोंदिया ३३ २२

तिरोडा १९ १२

-------------------------------

५० टक्केपेक्षा जास्त बसेस आगारातच

- गोंदिया आगारात ८१ बसेस असून प्रवासी प्रतिसाद नसल्याने काही फेऱ्या बंद असल्याने त्यातील ५७ बसेस सध्या सुरू आहेत.

- तिरोडा आगारात ४२ बसेस असून तेथेही प्रवासी प्रतिसाद कमी असल्याने ग्रामीण फेऱ्या बंद असल्याने ३६ बसेस सुरू आहेत.

- अवघ्या जिल्ह्यातच एसटीला प्रवासी प्रतिसाद कमी असल्याने आगारांनी फेऱ्या कमी केल्याने ५० टक्केपेक्षा जास्त बसेस आगारातच राहतात.

-----------------------------------

रुग्ण घटले, एसटी कधी धावणार ?

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आली असून नाममात्र रुग्ण उरले आहेत. मात्र तरीही ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. अशात आम्हाला प्रवासात गैरसोय होत आहे. एसटी येत नसल्याने ऑटो किंवा अन्य प्रवासी वाहनाने सोय करावी लागत आहे. एसटी सुरू झाल्यास सोयीचे होणार.

- रोहित गणवीर

------------------------------------

कोरोनामुळे आगाराने ग्रामीण भागातील फेऱ्या बंद केल्या आहेत. मात्र जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून आता कामे सुरू झाली आहेत. अशात बाहेरगावी जायचे असल्यास प्रवासाची सोय नसल्याने अडचण होत आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

- सचिन चव्हाण

----------------------------------

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असला तरीही एसटीला प्रवासी प्रतिसाद कमीच आहे. यामुळेच जेमतेम डिझेल खर्च निघेल अशीच परिस्थिती आहे. करिता काही फेऱ्या आतापर्यंत बंदच ठेवल्या आहेत. परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्यांना सुरू करता येईल.

- उमेश उके

वाहतूक नियंत्रक, गोंदिया

Web Title: The number of round trips decreased due to lack of response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.