न.प.ची पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:14+5:30
नगर परिषदेने शुक्रवारी सकाळी एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. नगर परिषदेसमोरील रस्त्यालगत अनेक व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून नाल्या देखील हरविल्या आहेत. यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने थोडा जरी पाऊस झाल्यास शहरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते.

न.प.ची पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्थानिक नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम ही शहरवासीयांसाठी एक चर्चेचा विषय झाला आहे. नगर परिषदेने आत्तापर्यंत एकही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविली नाही. सर्व मोहीमा या अर्ध्यावरच बंद पडल्या. त्यातच नगर परिषदेने शुक्रवारपासून (दि.२७) पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. नगर परिषद परिसरातून अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात करण्यात आली. अनेक दुकानासमोरील नालीवरील अतिक्रमण काढण्यात आल्याने काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाला ताला ठोकून घरी गेल्याचे चित्र होते.
नगर परिषदेने शुक्रवारी सकाळी एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. नगर परिषदेसमोरील रस्त्यालगत अनेक व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून नाल्या देखील हरविल्या आहेत. यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने थोडा जरी पाऊस झाल्यास शहरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे रस्ता आणि नाल्या मोकळ्या करण्यासाठी नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.यासाठी अतिक्रमणधारकांना पुर्वीच नोटीस देण्यात आले होते.काही दुकानादारांनी रस्त्यापर्यंत पक्के बांधकाम केले होते.
हे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच नालीच्या खोदकामाला सुध्दा सुरूवात करण्यात आली. नगर परिषदेत ते चांदणी चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यास सुरूवात करण्यात आली. ही मोहीम नगर परिषद स्वच्छता विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी राबविली. मुख्याधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्त्वात अभियंता रवी काकडे,सुमेध खापर्डे, राहुल डोंगरे, आनंद दाते, स्वच्छता विभागाचे गणेश हथकय्या यांनी राबविली.
विशेष म्हणजे नगर परिषदेने सुरू केलेल्या या कारवाईचा काही नगरसेवकांनी विरोध केल्याची माहिती आहे. त्यामुळे ही मोहीम सुध्दा अर्ध्यावरच बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काही दुकानदारांनी सुध्दा या नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे आमचे दुकान बंद करुन नगर परिषदेला काय मिळणार आहे असे सांगत या मोहीमेचा विरोध केला.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज
शहरातील रस्त्यांची आणि अतिक्रमणाची समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी सुध्दा माहिती आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी,अतिक्रमणातून रस्ते मुक्त करण्यासाठी त्यांनी सुध्दा पुढाकार घेण्याची गरज आहे. तर शहराचा विकास शक्य आहे.
रस्ते अतिक्रमण मुक्त होण्याची शक्यता कमीच
शहरातील बाजारपेठेतील रस्ते व्यावसायीकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे अधिकच अरुंद झाले आहे. यामुळे शहरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. हे अतिक्रमण काढून शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने आतापर्यंत अनेकदा मोहीम राबविली. मात्र या सर्व मोहीम अर्ध्यावरच बंद पडल्या. त्यातच शुक्रवारपासून सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेला काही नगरसेवकांनी विरोध केल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही मोहीम सुध्दा अर्ध्यावरच बंद पडण्याची शक्यता आहे. परिणामी रस्ते अतिक्रमण मुक्त होण्याची शक्यता फार कमी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज
नागपूर आणि चंद्रपूर शहरातील अतिक्रमणाची समस्या जिल्हाधिकाºयांनी स्वत: रस्त्यावर उतरुन मार्गी लावली होती. तशीच भूमिका येथील जिल्हाधिकाºयांनी घेण्याची गरज आहे. तरच शहरवासीयांना वाहतुकीच्या कोंडीपासून मुक्ती मिळू शकते.