पक्षाला नाही, तर व्यक्तीला महत्त्व
By Admin | Updated: October 9, 2014 23:03 IST2014-10-09T23:03:31+5:302014-10-09T23:03:31+5:30
अलिकडे जातीपातीचे राजकारण सुरू झाले. हा माझा पक्ष, तो तुमचा पक्ष म्हणून राजकारणी भांडू लागले आहेत. पण आम्ही पक्षाला महत्व न देता व्यक्तीला महत्व देऊन जनसामान्यांच्या समस्या जो

पक्षाला नाही, तर व्यक्तीला महत्त्व
लोकमत परिचर्चा : नवमतदार तरुणांनी व्यक्त केले निवडणुकीबद्दल मतप्रदर्शन
गोंदिया : अलिकडे जातीपातीचे राजकारण सुरू झाले. हा माझा पक्ष, तो तुमचा पक्ष म्हणून राजकारणी भांडू लागले आहेत. पण आम्ही पक्षाला महत्व न देता व्यक्तीला महत्व देऊन जनसामान्यांच्या समस्या जो कोणी उचलून धरेल, अशाच व्यक्तीची निवड करणार आहोत. मतदारांनी आपल्या मतांचे मूल्य ओळखून आपले मत कोणत्याही आमिषाला बळी न पडता, विकू नये, असे आवाहन गोंदियातील नवतरूणांनी केले.
गुरुवारी लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित तरूणांच्या परिचर्चेत ते बोलत होते. या चर्चेला नमाद महाविद्यालयातील इरसान पठान, ममिता पाचे, प्रगती मेश्राम, नुतन खोब्रागडे, एमआयबीपी महाविद्यालयाचे स्वीटी उके, प्रिती ठाकरे, संदीप वाढई, आकाश अग्रवाल, पियुष सतदेवे, अजय राणे, अवि बावणकर, राजकुमार बिसेन, अंकुश खापर्डे, मनिषा वाधवानी, हृद्या शेंडे, मेघना पटेल, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयातील पूजा तिवारी, मनदीप वासनिक, लोकेश शेंडे, सुनिता भेलावे, एम.बी.पटेल महाविद्यालय सालेकसा येथील माधवी चुटेलकर, धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयातील मनोज पारधी, पेमेश गौतम, मोहनीश बिसेन, आकाश पारधी व जगत महाविद्यालय गोरेगाव येथील प्रशांत वासनिक उपस्थित होते.
या चर्चासत्रात भाग घेतलेले अनेक तरूण विद्यार्थी पहिल्यांदाच मतदान करीत असल्याने मतदान प्रक्रियेसंदर्भात त्यांच्यात कुतूहल जाणवले. आपण भारताचे नागरिक आहोत, आपण निवडून दिलेला उमेदवार आपले प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे जबाबदार व्यक्तीला निवडून देताना आपण जाणकार झालो अशी भावना आपल्यामध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मताधिकाराचा उपयोग चांगल्या व्यक्तीच्या निवडीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसीची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची शिष्यवृत्ती अनेक वर्षापासून मिळाली नाही, या समस्येला कुणीही उचलून धरले नाही. त्यामुळे मतदान करताना या बाबीचा विद्यार्थी वर्ग निश्चितच विचार करतील.
आम्ही कुण्या पक्षाला पाहून मतदान करणार नाही तर व्यक्तीला पाहून मतदान करू, जेणेकरून ती व्यक्ती आमच्या समस्या सोडविल. गोंदिया जिल्ह्यातील तरूण बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी उद्योग नाही, एखादे काम करायचे असल्यास त्याला ८ ते १० वर्षे उशीर लागतो. यामुळे सामान्य माणूस भरडला जातो.
आपल्या विधानसभा क्षेत्राला आपले घर समजून कार्य केल्यास निश्चितच विकास होईल.
विदर्भाच्या मुद्यावर चर्चा करताना तरूण म्हणाले, विदर्भात वीज तयार होते, मात्र विदर्भवासीयांना अंधारात रहावे लागते. मग आपले नेते जातात कुठे? आपल्याकडील नेत्यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील नेते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता दाखवितात. येथील नेते त्याबाबत तत्परता का दाखवित नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समस्या सहन कराव्या लागतात.
रस्ते, पाणी, वीज या समस्यांना दुर करण्याचे आश्वासन उमेदवार निवडणुकीमध्ये देतात. मात्र निवडणूक होताच या समस्येवर विरजण टाकले जाते. त्यासाठी मतदारांनी जागृत होणे आवश्यक आहे. मतदारांनी कुठल्याही उमेदवाराच्या खोट्या आश्वासनाना बळी न पडता निष्पक्षपणे आपल्याला वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे. मतदान हा आपला अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन ही तरूणांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)