ग्रंथाचे जतन होणे काळाची गरज
By Admin | Updated: January 31, 2016 02:03 IST2016-01-31T02:03:15+5:302016-01-31T02:03:15+5:30
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ....

ग्रंथाचे जतन होणे काळाची गरज
ग्रंथ महोत्सवात परिसंवाद : ‘प्रभावी वाचनमाध्यमे’ विषयावर वक्त्यांचा सूर
गोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ गोंदिया व जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शारदा वाचनालय येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन समारंभानंतर दुपारच्या सत्रात प्रभावी वाचनमाध्यमे याविषयावर आयोजित परिसंवादातून सूर उमटला.
परिसंवादात एस.एस.गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. राजश्री धामोरीकर, प्रा. कविता राजाभोज, नमाद महाविद्यालयाच्या प्रा. रजनी चतुर्वेदी, ए.बी.महाविद्यालयाच्या प्रा. वर्षा गंगने, राजीव गांधी समाज महाविद्यालयाच्या प्रा. सविता बेदरकर, प्रा. संजय जगणे, व दिव्या डहाके यांचा समावेश होता. प्रा. डॉ. राजश्री धामोरीकर म्हणाल्या जीवन समृध्द करण्यासाठी वाचन अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाकरीता माध्यम कुठलेही असले तरी वाचनाने भावना विष्काराची कला अवगत होते. मित्र, तत्वज्ञ व वाटाड्याची भूमिका ग्रंथ बजावतात. त्यामुळे ग्रंथाचे जतन होणे गरजेचे आहे. प्रभावी वाचन तेच आहे. ज्यामुळे वाचनाचा मतितार्थ लक्षात राहतो. नमाद महाविद्यालयाचे प्रा. जगणे यांनी तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात ग्रथांचे वाचन करणे शक्य नाही असे सांगितले. तंत्रज्ञानाने जग जवळ आले असून एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध होते. त्याचा विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करुन घ्यावा असेही सांगितले.
प्रा. डॉ. वर्षा गंगणे म्हणाल्या, कोणतीही तंत्राज्ञनाची माध्यमे कल्पना विलासाची शक्ती निर्माण करु शकत नाही. कल्पना शक्तीची खरी ताकत ग्रंथामध्येच आहे. ग्रंथसंपदेसारखा दुसरा खजीना नसून आबालवृध्दाने वाचनाची सवय लावावी असे त्या म्हणाल्या.
प्रा. सविता बेदरकर यांनी ईलेक्ट्रानिक माध्यमे व ग्रंथ यातील फरक उपस्थितांच्या लक्षात आणून दिला. ईलेक्ट्रानिक माध्यमामुळे बुध्दीची तात्पूरती गरज भागते. परंतू ज्ञानाची भूक मात्र ग्रंथच भागवू शकतात. इंटरनेटवरील उपलब्ध माहितीमध्ये बरेचदा गोंधळाची स्थिती आढळत असल्याचे सांगितले. संचालन श्री शारदा वाचनालयाच्या ढोमणे यांनी तर आभार रहांगडाले यांनी मानले. कार्यक्र माला विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)