आनंदासाठी वाचन आवश्यक

By Admin | Updated: February 2, 2016 01:39 IST2016-02-02T01:39:58+5:302016-02-02T01:39:58+5:30

ग्रंथ स्वयंपूर्ण असतात. ग्रंथ वाचनाने प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे माणूस भीतीमुक्त होतो व अज्ञानी माणूस मात्र सतत भीतीच्या छायेत वावरतो.

Need reading for happiness | आनंदासाठी वाचन आवश्यक

आनंदासाठी वाचन आवश्यक

उपविभागीय अधिकारी राव : तीन दिवसीय ग्रंथोत्सवाची सांगता
गोंदिया : ग्रंथ स्वयंपूर्ण असतात. ग्रंथ वाचनाने प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे माणूस भीतीमुक्त होतो व अज्ञानी माणूस मात्र सतत भीतीच्या छायेत वावरतो. जीवनात आत्मशांती, विरंगुळा व भयमुक्ततेसाठी वाचन अवश्य करावे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांनी केले.
शारदा वाचनालय येथे तीन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी समारोपीय भाषणात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून तहसीलदार संजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज.सू. पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे खुमेंद्र बोपचे, जि.प. चे शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, शरद काथोडे व शारदा वाचनालयाच्या ढोमणे उपस्थित होते.
पुढे बोलताना राव म्हणाले, माणूस जे बोलतो ते त्याचे विचार असतात. पंरतु प्रगल्भ वाचनामुळे मनुष्य आपले मत बनवू शकतो. आपली भूमिका ठामपणे मांडू शकतो. स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावी लेखनाविषयी सांगताना, आत्मविश्वासासाठी वाचन करावे, असे ते म्हणाले. निरंतर वाचनातून काय वाचावे हेही मनुष्याला उमगत जाते. ग्रंथ हे आत्मसन्मानासाठी पात्र ठरवणारे मनुष्याचे खरे मित्र आहे. म्हणून ग्रंथांशी जवळीकता वाढवावी, असा सल्ला उपस्थित युवक-युवतींना त्यांनी दिला.
यानंतर संजय पवार म्हणाले, ग्रंथवाचन म्हणजे बुध्दीजीवांची मक्तेदारी राहू नये. वाचनाने संस्कृतीची जोपासना व संवर्धन होते. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी. अवांतर वाचनातून जागृत झालेली ज्ञानाची भूक वैचारीक, मार्मिक व चिंतनशील वाचनाने शमते. या अवस्थेपर्यंत जो पोहोचला तो पूर्णत्वाकडे वळला, असे म्हणावयास पाहिजे.
मोटघरे म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या प्रमाणात वाढला आहे, त्याच प्रमाणात युवकांनी ग्रंथवाचनाकडे वळणे गरजेचे आहे. शरद काथोडे यांनी, समाजामध्ये ग्रंथालयाची भूमिका ज्ञानमंदिराची असल्याची सांगून ज्ञानाचा प्रकाश दूरपर्यंत पोहोचिवण्याचे ते उत्कृष्ट साधन आहे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक खुमेंद्र बोपचे यांनी केले. ग्रंथोत्सवाच्या आयोजनामुळे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौध्दिक मेजवानीचा आस्वाद घेता आला, असे सांगितले. संचालन विद्या ठाकूरने केले. आभार पूजा सोनजल यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Need reading for happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.