शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता

By Admin | Updated: May 20, 2014 23:44 IST2014-05-20T23:44:43+5:302014-05-20T23:44:43+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सन २०१२-१३ पासून ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी

Need for ideas on the quality of schools | शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता

शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता

नामदेव हटवार - सालेकसा

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सन २०१२-१३ पासून ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी सन २०१३-१४ मध्येही तो प्रकल्प कायम ठेवण्यात आला. चुकांची दुरुस्ती करुन वर्ग १ ते ४ व वर्ग १ ते ७ अशा दोन गटात मूल्यांकन करण्याची व्यवस्था करण्यात आली. मूल्यांकनात यावेळी अनेक शाळांनी केवळ औपचारिकता दाखविण्यासाठी भाग घेतला तर काही शाळांची शोकांतिका निश्चितच समोर आली आहे. त्यामुळे गावची शाळा-आमची शाळा या प्रकल्पाचा उद्देश पूर्णत्वास जाईल काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ‘गावची शाळा आमची शाळा’ हा प्रकल्प यशस्वी करायचा असेल तर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुल्यांकन समितीचे सचिव म्हणून काम करतात. सालेकसात अनेक वर्षापासून गटशिक्षणाधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. प्रभारी म्हणून उसनवारीवर काम सुरु आहे. त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काम होत नाही. खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही पदे एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे कामे करताना वेळेअभावी समस्या निर्माण होतात. तरी पण अनेक शाळांना अचानक भेटी देऊन व शाळेत गैरहजर असणार्‍या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकार्‍यांनी केल्याचे दिसून येते. अनेक शिक्षक मुख्यालयात राहात नसल्याचे यावर्षीही पाहायला मिळाले. त्यांचे अप-डाउन आणि वेळेचे बंधन न पाळता केली जाणारी पळापळी यामुळे तेथील शैक्षणिक दर्जा काय असणार याचा विचारच केलेला बरा. दरेकसा परिसरातील काही शिक्षक पॅसेंजर मिळावी म्हणून ४.३० वाजताच शाळांना दांडी मारुन रेल्वे पकडण्यासाठी येत असतात. हाच प्रकार सालेकसा तालुक्यातील अनेक शाळांत दिसून येतो. त्यामुळे या शिक्षकांचे लक्ष शिकविण्यापेक्षा कमी आणि स्वत:च्या समस्या व अडचणी सोडविण्याकडे जास्त असते. या प्रकल्पांतर्गत अनेक शाळांनी आपापल्या पद्धतीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही शाळांनी या प्रकल्पाची फक्त रकानापूर्ती केली. नोकरी करणे व पगार घेणे एवढाच काही शिक्षकांचा उद्देश दिसून येतो. गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाची अजूनही तालुक्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्या शाळांना मुल्यांकनात ६० ते ७० टक्यांपेक्षा कमी गुण मिळतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्मचारी वर्गालाही नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. समितीच्या मूल्याकंनात काही शाळांमधील दुरवस्था दिसून आली. दर्जेदार शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. मूल्यमापनात शिक्षण विभागाने लोकशाही चौथ्या स्तंभाला डावलून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शाळांतील शिक्षक मुल्याकंनात कमी पडले, त्यांनी सुधारणा करणे आवश्यक आहे. मागच्या वर्षी प्रथम, द्वितीय क्रमांकप्राप्त शाळांचा दर्जा वर्षी माघारला तर नवीन शाळांनी परिश्रमांती पुरस्कार प्राप्त केले, ही त्या शिक्षकांची व गावकर्‍यांची मेहनत आहे. त्यामुळे योजना यशस्वी होवो न होवो, त्याच्याशी आपल्याला काही देणे-घेणे नाही असा विचार जर शिक्षक, कर्मचारी, गावकरी करीत असतील तर शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ होण्यास काहीच वेळ लागणार नाही. काही शाळा एवढ्या दर्जेदार आहेत की तेथील विद्यार्थ्यांनी, पालक समितीने शिक्षकांवर नियंत्रण ठेवलेले आहे. तरीपण शाळांच्या मुल्याकंनात अनुत्तीर्ण शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता आहे, असे दिसून येते. काही शाळांना सुविधा नाहीत, तेथे शिक्षण विभाग सुविधा देणार काय, हा सुद्धा प्रश्न आहे. तरीपण दर्जेदार शिक्षणासाठी सर्वांनी परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Need for ideas on the quality of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.