नवेगावबांधचा भिसकंद परराज्यात
By Admin | Updated: May 15, 2014 23:42 IST2014-05-15T23:42:03+5:302014-05-15T23:42:03+5:30
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील भिसकंद ही मौल्यवान वनस्पती अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे नष्ट होत आहे. या भिसकंदाची दररोज चोरी होत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

नवेगावबांधचा भिसकंद परराज्यात
पक्ष्यांच्या खाद्यात घट : अवैध खोदकाम, लाखो रुपयांचे नुकसान संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगाव नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील भिसकंद ही मौल्यवान वनस्पती अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे नष्ट होत आहे. या भिसकंदाची दररोज चोरी होत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अधिकार्यांचे या तस्करांशी साटेलोटे असल्याचे समजते. नष्ट होणार्या या वनस्पतीमुळे देशी-विदेशी पक्षी या प्रसिध्द पर्यटन स्थळाकडे फिरकेनासे झाले आहेत. भिसकंदाच्या अवैध खोदकामामुळे तलाव बुजत चालला आहे. प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात भिसकंद नावाची वनस्पती मोठय़ा प्रमाणावर आहे. ही वनस्पती अत्यंत कमी ठिकाणी आढळून येते. देशी विदेशी पक्षांचे हे आवडते खाद्य आहे. या भिसकंदचा स्वयंपाकात भाजीसाठी वापर केला जातो. या भिसकंदला गोंदिया, नागपूर, दुर्ग, रायपूर, वडसा, कुरखेडा येथे मोठी मागणी आहे. भिसकंदाच्या झाडाखाली विशेषत: उन्हाळ्यात अनेक पक्षी आश्रयाला असतात. या झाडांमुळे त्यांना सावलीचा आनंद व खाद्य मिळतो. ही वनस्पती राष्ट्रीय उद्यानात असलेल्या तलावाच्या दर्शनी भागातून याचपध्दतीने नष्ट झाली आहे. ती विशेषत: तलावाच्या दुसर्या टोकावरील येलोडी, जांभळी, पवनी/धाबेटेकडी, रामपुरी या भागात हमखास बघावयास मिळते. परराज्यातील बाजारात या वनस्पतीला प्रचंड मागणी आहे. विशेषत: सिंध प्रांतातील लोक या वनस्पतीचा भाजीसाठी वापर करतात. त्यांच्याकडे धार्मिक, सामाजिक उत्सवप्रसंगी भोजनात भिसकंद दिसून येतो. या भिसकंदची बाजारात ४0 ते ५0 रुपये किलोप्रमाणे विक्री केली जाते. येलोडी, जांभळी,पवनी/धाबे व रामपुरी येथील काही इसम या वनस्पतींच्या तस्करीत गुंतले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तलावात या वनस्पतीचे कंद काढण्यासाठी खोदकाम केले जाते. व रात्री सुमारे ३ वाजेच्या सुमारास मोटरसायकलने नवेगावबांधकडे हे भिसकंद आणले जातात. येथूनच मग पुढे कुढल्या बाजारपेठेत पाठवायचे ते ठरविले जाते. तस्करांचा हा नित्यक्रम आहे. एका गावातून दररोज सुमारे पाचशे किलो ही वनस्पती बाहेर पाठविली जाते. चार-पाच गावांमधून दररोज सुमारे २ क्विंटुल भिसकंदची तस्करी होते. भिसकंदच्या आकर्षणामुळे येथे दरवर्षी सैबेरियन पक्षी मोठय़ा प्रमाणावर येतात. मात्र भिसची झाडे तोडून त्यातील कंद काढला जात असल्याने ही झाडेच नष्ट होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचे हे सुरक्षित राहणीमान धोक्यात आले आहे. पक्षी झाडांच्या सावलीचा आश्रय घेतात. येथेच त्यांना खाद्य मिळतो. येथेच ती अंडी घालतात मात्र मानवी अधिवासामुळे ते असुरक्षित आहेत. अवैध उत्खननातून पक्षांची अंडी नष्ट होतात त्यामुळे पक्षांची संख्येत वाढ होत नाही. याचवेळी नेमकी संधी साधून हे तस्कर पक्ष्यांची शिकार सुद्धा करतात. बाजारात विदेशी पक्षांच्या मासाला मोठी किमत मिळते. पहाडावरून पावसाळ्यात तलावात येणार्या पाण्याच्या लोंढय़ामुळे खोदकाम झालेल्या ठिकाणी साचलेली माती प्रवाहाने तलावात वाहून गेल्याने तलाव बुजतो. एकतर अनेक वर्षांपासून तलावाचे खोलीकरणच झालेले नाही. त्यामुळे पाण्याच्या संचय क्षमतेत दिवसेंदिवस घट होत आहे.