आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू
By Admin | Updated: October 17, 2015 02:28 IST2015-10-17T02:28:37+5:302015-10-17T02:28:37+5:30
नवेगावजवळील देवलगावच्या नत्थूजी पुस्तोडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीची प्रकृती ....

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू
अर्जुनी मोरगाव/नवेगावबांध : नवेगावजवळील देवलगावच्या नत्थूजी पुस्तोडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडून तिचा गूढपणे मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१५) रात्री १० वाजतादरम्यान घडली. कविता मंगलू कुंजाम असे त्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे.
मृतक कविता ही मूळची धमदीटोला (ता.देवरी) येथील रहिवासी आहे. ती आश्रमशाळेत अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. ९ आॅक्टोबर रोजी कविता स्वगावी गेली होती. गुरुवारी (१५) सायंकाळी ती आश्रमशाळेत परत आली. तिने शाळेतच भोजन केले. त्यानंतर गावी गेलेल्या कालावधीचा अभ्यास व गृहपाठ घेवून ती अभ्यासाला बसली. रात्री ८ वाजेदरम्यान अचानक तिची प्रकृती बिघडली. तिला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी गोंदिया येथे हलविण्याचा सल्ला दिला.
नवेगावबांध येथून गोंदियाला नेत असताना डव्वानजीक तिचा मृत्यू झाला असावा अशी शंका आली. त्यामुळे वाहनात असलेल्या परिचारिकेने ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी रुग्णालयात आणण्याचा सल्ला दिला. तिथे तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सडक अर्जुनी येथेच शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली. मात्र वाटेत मृत्यू झाला असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला. त्यानंतर कविताचा मृतदेह नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
या प्रकरणाची माहिती प्रकल्प कार्यालय देवरी यांना कळविण्यात आली. आश्रमशाळेला प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी बेले यांनी भेट दिली.
उत्तरीय तपासणीस विलंब
शुक्रवारी (दि.१६) सकाळी उत्तरीय तपासणीची (शवविच्छेदन) प्रक्रिया सुरू करावयाची होती. मात्र महिला डॉक्टर नसल्याने गोंदिया येथून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले. मात्र उशिरापर्यंत त्या पोहोचल्या नाही. शेवटी सडक अर्जुनी येथील डॉक्टर शवविच्छेदनासाठी येणार होते, मात्र पोलीस संरक्षण नसल्याने त्यांनी येण्यास नकार दर्शविला. यात बराच वेळ निघून गेला. अखेर पावणेचार वाजता कविताची उत्तरीय तपासणी करण्यात आली व मृतदेह वडीलांच्या सुपूर्द करण्यात आला. ही उत्तरीय तपासणी तब्बल दोन तासपर्यंत चालली. मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही.