एक घागर पाण्याने दिवस काढावा लागतो

By Admin | Updated: May 31, 2015 00:44 IST2015-05-31T00:44:07+5:302015-05-31T00:44:07+5:30

जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत.

A mustard day has to be removed with water | एक घागर पाण्याने दिवस काढावा लागतो

एक घागर पाण्याने दिवस काढावा लागतो

पाण्याची चणचण : वळदगावच्या विहिरी आटल्या
आमगाव : जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत. बोअरवेल मधून पाणी निघत नाही. फक्त जुन्या नळ योजनेचा एक घागर पाणी घेऊन वळद गावकरी दिवस काढत आहेत. एवढी गंभीर समस्या पाण्याची या गावात आहे.
२० वर्षापूर्वी ३० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी तयार करण्यात आली. त्यावेळी गावाची लोकसंख्या ७५० होती. आज लोकसंख्या दुप्पट झाली आहे. गावात जुन्या नळ योजनेचे पाईप प्रत्येक वार्डात आहेत. मात्र पूर्ण गावाला ३० हजार लिटरची नळ योजना कुचकामी ठरली आहे. फक्त एक घागर पाणी प्रत्येक घराला मिळत आहेत. बोअरवेलमधून जलस्तर खाली गेल्याने पाणी निघत नाही. गावातील मालगुजारी तलावात ओवारा मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडले तर वळद येथील पाणी समस्या मिटू शकतो.
ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडने कालव्याला अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा काही दिवसांनी वळद येथील पाणी समस्या उग्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांच्या समस्येचा विचार करता तत्काळ कालव्याला ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी सरपंच उषा परिहार, उपसरपंच खेमचंद पटले, किशोर रहांगडाले, कल्पना तुरकर, कांता कोडापे, शिवसागर परिहार, संतोष पारधी, धनलाल कटरे व अन्य ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

प्रशासकीय तयारी कागदावरच
दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन केले जाते. त्यासाठी शासनाकडून बराच निधीही मिळतो. मात्र प्रशासकीय तयारी कागदावरच राहते. प्रत्यक्षात कामे होतच नाहीत. गावकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन समस्या सोडविणे गरजेचे आहे.

गावकऱ्यांना दिलासा देण्याची गरज
ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे अनेक गावात टंचाई कायम आहे.

पाण्यासाठी नागरिकांची करावी लागते कसरत
ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल, विहिर कोरड्या पडल्या आहेत. तलावातील पाणी बैलबंडीने ड्रमद्वारे आणले जात आहे. अनेक वर्षांपासून बाघडोंगरीत पिण्याच्या व घरगुती वापराकरिता पाणी ही मोठी गंभीर समस्या आहे. या गावात गोंड समाज जास्त आहे. ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत बाघडोंगरी, पिपरटोला, बाघाटोला, जांभुळटोला यांना मोठी नळयोजना अत्यंत गरजेची आहे.

Web Title: A mustard day has to be removed with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.