एमपीएससीची परीक्षा द्यायची की रेल्वेची? विद्यार्थ्यांसमोर पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST2021-03-17T04:30:20+5:302021-03-17T04:30:20+5:30
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलत ती २१ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ...

एमपीएससीची परीक्षा द्यायची की रेल्वेची? विद्यार्थ्यांसमोर पेच
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलत ती २१ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचदिवशी रेल्वेचीसुध्दा परीक्षा आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यातच आता या दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने परीक्षेला बसणारे विद्यार्थी गोंधळात पडले असून, अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी अभ्यासानुसार कोणती परीक्षा द्यायची, याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने एमपीएससी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला. दरम्यान, यावरुन गोंधळ उडून राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर राज्य सरकारने २१ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा घेण्याचे जाहीर केले. मात्र रेल्वे विभागाने परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली होती. त्यामुळे आता या दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांनी रेल्वेपेक्षा एमपीएससीच्या परीक्षेला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने त्यांनी तयारीसुध्दा केली आहे. जिल्ह्यातील एकूण ६ केंद्रावरून एमपीएससीची परीक्षा होणार असून, यासाठी १७५२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावरील २५० कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
..............
रेल्वेची परीक्षा होणार ऑनलाईन
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने मागील चार पाच वर्षांपासून रेल्वेची परीक्षा ऑनलाईन घेण्यास सुरुवात केली आहे. ३२ हजार २०८ जांगासाठी २१ मार्च रोजी परीक्षा होणार असून, यासाठी जिल्ह्यातील अडीच हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होेते. नागपृूर, रायपूर, बिलासपूर या ठिकाणी रेल्वे परीक्षेचे केंद्र असून, काही शहरांमध्ये लॉकडाऊन असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.
.......
विद्यार्थ्यांची होणार कसरत
रेल्वे परीक्षेचे केंद्र नागपूर, रायपूर, हैदराबाद या ठिकाणी आहे. मात्र नागपूर येथे लॉकडाऊन असल्याने येथे परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर परीक्षा केंद्रावर वेळीच पोहोचण्यासाठी बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिवस आधीच पोहचावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच कसरत होणार आहे.
......
दोन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतात....
रेल्वे आणि एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला होणार आहे. मी दोन्ही परीक्षेसाठी अर्ज भरले होेते. पण एमपीएससीच्या परीक्षेसाठी मी आधीपासूनच तयार केली होती. म्हणून मी रेल्वेऐवजी एमपीएससीची परीक्षा देणार आहे.
- आदित्य लुलू, परीक्षार्थी
......
राज्य शासनाने एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात वेळोवेळी बदल केला. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थीसुध्दा गोंधळात पडले. रेल्वे विभागाची परीक्षासुध्दा नेमकी त्याचदिवशी येणार, अशी कल्पना नव्हती. मात्र आता अभ्यासानुसार निर्णय घेणार आहे.
- नितीन वाळके, परीक्षार्थी
.......
रेल्वे विभागाची परीक्षा बऱ्याच दिवसांनी होत आहे. तसेच या परीक्षेसाठी मी सुरुवातीपासून तयारी केली आहे. त्यामुळे मी रेल्वेची परीक्षा देणार आहे. मात्र राज्य सरकारने केलेल्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
- विराज पटले, परीक्षार्थी.
...........
२१ मार्च रोजी होणार दोन्ही परीक्षा
एमपीएससीसाठी विद्यार्थी
१७५२
परीक्षा केंद्रे
६