खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त, जनता त्रस्त

By Admin | Updated: February 18, 2015 01:41 IST2015-02-18T01:41:11+5:302015-02-18T01:41:11+5:30

भाजप-सेना युती शासनाचे १०० दिवस पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र गाजावाजा होतोय. राज्य मंत्रीमंडळात अर्जुनी मोरगावसारख्या आदिवासी, ...

The MP is busy, the minister is busy, the public is in trouble | खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त, जनता त्रस्त

खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त, जनता त्रस्त

संतोष बुकावन ल्ल
भाजप-सेना युती शासनाचे १०० दिवस पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र गाजावाजा होतोय. राज्य मंत्रीमंडळात अर्जुनी मोरगावसारख्या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त मतदारसंघाला स्थान मिळाले, हे येथील जनतेचे सुदैव. राज्याच्या प्रगती आढाव्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री उत्तीर्ण झाले असले तरी मतदारसंघाच्या ज्वलंत समस्यांबाबत अजूनही ते फारसे गंभीर झालेले नाहीत. दुसरीकडे लोकसभा निवडणूक होऊन ९ महिने उलटले, पण लोकांनी ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्या खासदार नाना पटोले यांचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त आणि जनताजनार्दन त्रस्त, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला तत्कालीन अर्थमंत्री महादेवराव शिवनकर यांच्यानंतर तब्बल १५ वर्षानंतर स्थान मिळाले, ही निश्चितच जिल्हावासियांसाठी आनंदाची बाब आहे. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील जनतेचा तर आनंदच गगनात मावेनासा झाला आहे. आपला मंत्री म्हटल्यानंतर अपेक्षा बाळगणे हे गैर नाही. पण आपले आमदार हे केवळ अर्जुनी-मोरगावचेच नव्हे तर राज्याचे मंत्री झालेत याचे भान जनतेने सुद्धा ठेवणे आवश्यक आहे. विकासकामे व भेटीगाठींसाठी थोडासा संयम ठेवलाच पाहिजे. एका बाजूला जनतेचे बरोबरच आहे. यावर्षी पाणीटंचाईचे संकट उद्भवणार असल्याची चाहूल जनतेला लागली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १५ गावांसाठी असलेली नळयोजना महिनाभरापासून बंद आहे. पाच दिवसात नळयोजना सुरु होणार आशी खोटी उत्तरे अधिकारी देतात. लोकप्रतिनिधींना या उत्तराने हायसे वाटते, मात्र समस्या मार्गी लागत नाही याला काय म्हणावे? दरवर्षी पंचायत समिती कार्यालयात उन्हाळापुर्व पाणीटंचाई आढावा सभा घेतली जाते. या सभेचे अध्यक्ष आमदार असतात. यावर्षी १३ जानेवारीला सभा झाली. या सभेत मंत्रीमहोदय हजर राहू शकले नाहीत.
अर्जुनी-मोरगाव बसस्थानकाचे १७ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन पार पडले. अर्जुनी-मोरगाव-यवतमाळ या बससेवेला ना.बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पण या बसचे वांधे संपलेले नाही. कधीकधी ही बस जातच नसल्याची ओरड प्रवाशांकडून केली जाते. यापूर्वी अर्जुनी येथून गोंदियासाठी बससेवा नव्हती. ती उद्घाटनानंतर सुरु करण्यात आली. एक नव्हे तर तीन फेऱ्या सुरु झाल्या. मात्र चालक-वाहक उपलब्ध राहात नसल्याने अनेकदा गोंदिया येथून बस येतच नाही. प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असतात. गोंदिया आगाराच्या ज्या बसेस आहेत, त्या ऐन ट्रेनच्या वेळेवर असल्याने पाहिजे तेवढ्या उपयोगी नाहीत. केवळ गोंदियाकडे जाणारी सकाळची बस अधिक सोईची आहे. अर्जुनी-मोरगाव ते कोहमारापर्यंत दिवसभर चालणारी एक बससेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळता येऊ शकते. सातत्याने मागणी करुनही या समस्येकडे लोकप्रतिनिधी व एसटी विभागाने अधिकारी कानाडोळा करतात.
अर्जुनी-मोरगाव येथील एमआयडीसीचा प्रश्न रेंगाळत आहे. एक्सप्रेस ट्रेनचा अर्जुनी-मोरगाव येथे थांबा द्यावा. तेथे उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे. खासदार महोदय निवडून आल्यानंतर दिसतच नाही अशी ग्रामीण भागात ओरड आहे. या परिसरात बेरोजगारीचा भस्मासूर आहे. आपल्या साधनसमृद्धीवर आधारित उद्योगाला बराच वाव आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. मात्र येथे उद्यानच नाही. राष्ट्रीय उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव कधी लाभेल याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे.

Web Title: The MP is busy, the minister is busy, the public is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.