जिल्ह्यातील ३९० गावांची आदर्शत्वाकडे वाटचाल

By Admin | Updated: April 30, 2016 01:42 IST2016-04-30T01:42:50+5:302016-04-30T01:42:50+5:30

‘गुरू राष्ट्रसंतजीने लिखी जो ग्रामगीता, आदर्श गाव करणे आचारकी संहीता’ हे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील भजन तुकडोजी महाराजांनी लिहीलेल्या ग्रामगीतेचा अर्थ सांगून जाते.

Moving towards the ideals of 390 villages in the district | जिल्ह्यातील ३९० गावांची आदर्शत्वाकडे वाटचाल

जिल्ह्यातील ३९० गावांची आदर्शत्वाकडे वाटचाल

आज राष्ट्रसंतांची जयंती : ग्रामगीतेच्या उपदेशातून बदलतेय ग्रामीण जीवनमान
नरेश रहिले गोंदिया
‘गुरू राष्ट्रसंतजीने लिखी जो ग्रामगीता, आदर्श गाव करणे आचारकी संहीता’ हे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील भजन तुकडोजी महाराजांनी लिहीलेल्या ग्रामगीतेचा अर्थ सांगून जाते. आदर्श ग्रामाची संकल्पना मांडणाऱ्या राष्ट्रसंतानी ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली. शेतकरी या देशाचा पोषणकर्ता असल्यामुळे शेती उन्नतीचा मार्गही त्यांनी ग्रामगीतेतून सांगितला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर पाऊल टाकणाऱ्या जिल्ह्यातील ३९० गावांत ४०३ गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. त्या गावातील लोक ग्रामगीतेच्या उपदेशातून आपल्या गावाला आदर्शतेकडे नेण्यासाठी वाटचाल करीत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचार-प्रसार गोंदिया जिल्ह्यात करण्यात आला. जिल्ह्यात २५ हजार लोक गुरूदेव सेवा मंडळाशी जुळलेले आहेत. परंतु त्या लोकांमध्ये तरुण वर्ग फक्त ५ ते १० टक्के आहे. तुकडोजी महाराजांचा चाहता वर्ग व त्यांच्या लेखनीपासून प्रभावी झालेले लाखो नागरिक जिल्ह्यात आहेत. परंतू ज्यांच्यासाठी महाराजांनी हे वैचारिक प्रबोधन केले तीच तरुण पिढी दूर आहे. नवीन पिढी टीव्ही व टेक्नॉलाजीमुळे संत महापुरुषांच्या साहित्याकडे दुर्लक्ष करु लागली. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत आपल्या संस्कृतीला वेशीवर टांगले. तरुणांचा कल गुरुदेव सेवा मंडळाकडे वाढणे आवश्यक आहे.
‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या तत्कालीन पिढीतील गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक आजही त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवित आहेत. गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर तुकडोजी महाराजांचे कीर्तन, प्रबोधन अनेक गावांत झाले. त्यातून प्रेरित झालेले अनेक लोक गुरूदेव सेवा मंडळाचे सेवेकरी होऊन आयुष्यभर त्यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करीत आहेत.
गावागावात गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. व्यसनाधिनता, दारू, गांजा, चोरी यावर तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनांच्या माध्यमातून जनजागृती करतात. भ्रृणहत्या, आत्महत्या करु नका असा संदेश देत शरीर स्वच्छतेबाबत वैचारिक दृष्टीकोन बदलविण्यासाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता, लहर की बरखा, अभंग, विविध भजनांची पुस्तके समग्र वाङमयाच्या माध्यमातून प्रबोधन करणे सुरू आहे.

३७ हजार लोकांनी दिली ‘ग्रामगीता’ जीवन परीक्षा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमामार्फत दरवर्षी ग्रामगीता जीवन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी, महिला, पुरुष, भाविक व शिक्षक अशा ३७ हजार लोकांनी दिली आहे. ग्रामगीताचार्य परीक्षेला १५ लोक बसले, त्यात सहा लोकांना ‘ग्रामगीताचार्य’ ही पदवी मिळाली.
गाव तेथे मासिक
वंदनिय महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोण लक्षात ठेवून पुण्यतिथी, जयंतीच्या कार्यक्रमातून द्वैतभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत केली. गावातील लोकांना, नवीन पिढीला ग्रामगीता जीवन परीक्षेच्या माध्यमातून आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न येथील गुरुदेव सेवा मंडळ करीत आहेत. गाव तेथे गुरुदेव सेवा मंडळ, गाव तेथे प्रार्थना, गाव तेथे गुरुदेव मासिक पोहचविण्याचा मानस गुरुदेव सेवा मंडळाचा आहे.
ग्रामगीता अभ्यासक्रमातून सांगावी
आजच्या विद्यार्थ्याना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे अध्याय अभ्यासक्रमातून देण्यात यावे. त्यामुळे समग्र ग्रामगीता नवीन पिढीच्या कानी-मनी पडले. यासाठी नागपूर विद्यापीठाने, पुणे शिक्षण मंडळाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याला शैक्षणिक प्रवाहात आणावे अशी मागणी पदमपूर येथील श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सहसचिव शंकर वारंगे यांनी केली आहे.

Web Title: Moving towards the ideals of 390 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.