पुजारीटोलातून सोडले गरजेपेक्षा अधिक पाणी
By Admin | Updated: October 15, 2015 02:11 IST2015-10-15T02:11:37+5:302015-10-15T02:11:37+5:30
बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते.

पुजारीटोलातून सोडले गरजेपेक्षा अधिक पाणी
बिजेपार : बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते. खरिपातील भारी धानाकरिता हे पाणी अजूनही सोडले जात असले तरी हलक्या धानासाठी ते मारक ठरत आहे.
पुजारीटोला धरणातून दोन कालवे दिल्या गेले आहेत. उजव्या कालव्यातून मध्य प्रदेशातील लांजीपर्यंत पाणी दिल्या जातो तर डाव्या कालव्याचे पाणी गोंदिया तालुक्यातील रावणवाडीपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी सोडल्या जाते. हे तिन्ही धरण महाराष्ट्र राज्य व मध्यप्रदेश राज्य यांच्या संयुक्त परियोजनेने बनलेले आहेत. सध्या धानाच्या वाणाला पाणी दिल्या जात आहे. परंतु एकीकडे हलक्या प्रतीचा धान आता कापण्यास सुरुवात झाली आहे तर पुजारीटोला धरणाच्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यामुळे काही शेतकरी त्रस्त झाले आहेत. पं.स. सदस्य दिलीप वाघमारे हे आपल्या क्षेत्राचा दौरा करताना संबंधित बाब लक्षात आल्याचे सांगितले. कोटरा-हलबीटोला, लोहारा, गोर्रे, शेरपार, या गावातील काही शेतकरी शेतातून अतिरिक्त प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे धानाला सुखण्याकरिता वातावरणच मिळत नाही, असे लोहारा येथील प्रगतिशिल शेतकरी युवराज नारायण कटरे यांनी सांगितले. त्यांनी असेही सुचित केले आहे की, जर मध्यप्रदेशातील शेवटच्या शेतकऱ्यांना पाणीच लागत असेल तर नहराची पाण्याची पातळी कमी करुन द्यावी. पाणी जर शेतकऱ्यांना हवे नसेल व सतत दोन्ही कालव्यातून पाणी असेच सोडल्यास पाण्याचा अपव्यय होईल व आगामी रबी पिकाचे क्षेत्र सुद्धा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांनी याची शहनिशा करुन दोन्ही कालव्याचे पाणी त्वरित थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)