गोंदियात घरातूनच चोरीला जातात मोबाईल; दिवसाकाठी ८ मोबाईल हरवितात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:44+5:302021-07-05T04:18:44+5:30
गोंदिया : आजघडीला मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. परंतु मोबाईल हरविण्याचे किंवा चोरीला जाण्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले ...

गोंदियात घरातूनच चोरीला जातात मोबाईल; दिवसाकाठी ८ मोबाईल हरवितात
गोंदिया : आजघडीला मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. परंतु मोबाईल हरविण्याचे किंवा चोरीला जाण्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून कागदपत्रांच्या होत असलेल्या कटकटीमुळे अनेक लोक तर तक्रार करायलाच पुढे येत नाहीत. जे लोक पुढे येतात, त्यांची संख्या पाहता दिवसाकाठी ८ लोकांचे मोबाईल हरविले जातात किंवा चोरी होतात. त्यामुळे प्रत्येकाने मोबाईल सांभाळण्याची गरज आहे. गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. या आठ तालुक्यात १६ पोलीस ठाणे असून, या पोलीस ठाण्यांचा आढावा घेतल्यास मोबाईल चोरी किंवा मोबाईल हरविण्याचे प्रमाण मोठे आहे. परंतु दररोज कमीत कमी आठ मोबाईल गायब होत असल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात आहे. यापेक्षाही मोठ्या प्रमाणात मोबाईल हरवले किंवा चोरीला जात आहेत. परंतु अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मोबाईल खरेदी केल्यावर महिने-दोन महिने मोबाईलचे बिल सांभाळून ठेवले जाते. परंतु अधिक वेळ झाल्यावर नवीन मोबाईलचे बिलही सांभाळले जात नाही. अशा स्थितीत मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर मोबाईलचे बिल आणल्याशिवाय पोलीस तक्रारच घेत नाहीत. त्यामुळे अनेक लोक मोबाईल चोरीला गेले तरी तक्रार करायला पुढे येत नाहीत, हे वास्तव आहे. फक्त सीमचा गैरवापर होऊ नये, असे मोबाईलधारकांना वाटते.
............................
गर्दीत जाताय, मोबाईल सांभाळा
आपण लग्न समारंभात, उत्सव, मेळाव्यात, मेळा किंवा बाजारात जात असाल तर आपला मोबाईल सांभाळून ठेवा. कारण गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. अनेकांना मोबाईलची भुरळ पडल्याने हातात पैसे नसल्याने दुसऱ्याचे मोबाईल पळविण्याचा सपाटा सुरू आहे. प्रत्येकाने आपला मोबाईल सांभाळून गर्दीत प्रवेश करावा. गर्दीचा फायदा घेत आपला मोबाईल चोरीला जाऊ नये किंवा गर्दीत धक्काबुक्कीत आपला मोबाईल खाली पडू नये, याची खबरदारी घ्यावी.
..............................
मोबाईल तपास लागण्याचे प्रमाण २० टक्केच
गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीला जात आहेत. चोरीला गेलेले मोबाईल मिळण्याचे प्रमाण गोंदिया जिल्ह्यात फक्त २० टक्के आहे. ८० टक्के मोबाईल मिळतच नाहीत. पोलिसांच्या सायबर सेलने त्या मोबाईलचा टॉवर लोकेशन मिळवला तरी गोंदियातून चोरलेला मोबाईल बिहार, उत्तर प्रदेश, कोलकाता अशा लांबवर असला तर तो फक्त मोबाईल आणण्यासाठी पोलीस जात नाहीत. त्यामुळे चोरीला गेलेला मोबाईलही सरळ हरवल्याचे दाखवून पोलीस मोकळे होतात.
...............................
या ठिकाणी सांभाळा मोबाईल
मेडिकल कॉलेज
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय
जयस्तंभ चौक
बसस्थानक मरारटोली
बालाघाट टी पाईंट
कुडवा चौक
बाजार परिसर
.....................
कोट
मागील दोन - पाच महिन्यांपूर्वी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना अटक करून त्यांच्या जवळून २६ मोबाईल जप्त केले होते. त्या महिलांवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या जवळून काही मोबाईल हस्तगत करण्यात आले. मोबाईल चोरांवर आमची करडी नजर आहे.
-महेश बन्सोडे,
पोलीस निरीक्षक गोंदिया.
...........................
२०२० मध्ये दाखल झालेल्या तक्रारी
जानेवारी- १३
फेब्रुवारी- ११
मार्च - १४
एप्रिल- २
मे- २
जून - ३
जुलै- ४
ऑगस्ट - ६
सप्टेंबर- ८
ऑक्टोबर- १०
नोव्हेंबर- १३
डिसेंबर- १५