लाखोंच्या मासोळ्या झाल्या नष्ट
By Admin | Updated: June 14, 2014 23:41 IST2014-06-14T23:41:42+5:302014-06-14T23:41:42+5:30
यावर्षी भर उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा शिल्लक साठा असताना सहकारी संस्थेला पूर्वसूचना न देता जलाशयातील पाणी पूर्णत: काढून रिकामे करण्याचा प्रताप देवरीतील पाटबंधारे विभागाने केला.

लाखोंच्या मासोळ्या झाल्या नष्ट
संस्थेचे नुकसान : पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा
लोहारा : यावर्षी भर उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा शिल्लक साठा असताना सहकारी संस्थेला पूर्वसूचना न देता जलाशयातील पाणी पूर्णत: काढून रिकामे करण्याचा प्रताप देवरीतील पाटबंधारे विभागाने केला. या कारणाने जलाशयातील सर्व मासे मरून संस्थेचे पाच लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संस्थेने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
देवरी तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे सालेगाव जलाशय हे मत्स्य व्यावसायाकरिता नवनीत आदिवासी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित चांदलमेटा यांनी पाटबंधारे विभागाकडून लिजवर घेतले आहे. दरवर्षी मत्स्यपालन करुन आपले व्यवसायातून संस्थेला चांगला नफा मिळतो. नेहमीप्रमाणे सदर संस्था मत्स्य व्यावसायाकरिता मासोळ्या पकडण्याचे कार्य जून महिन्याच्या तिसऱ्या, चवथ्या आठवड्यात करीत असतात. पुन्हा पावसाळा सुरू होताच मत्स्य बीज खरेदी करुन मत्स्यपालन करीत असतात. परंतु यावर्षी सदर जलाशयात पाण्याचा साठा भरपूर असल्याकारणाने उन्हाळी धानपिकाकरिता पाणी सोडले.
धानाचे पिक निघाल्यानंतर सुद्धा पाण्याचा साठा चांगल्या प्रमाणात शिल्लक होता. तेव्हा विभागाने जलाशय खाली करण्याच्या दृष्टीने पूर्णत: पाणी कालव्याद्वारे काढून जलाशय कोरडे करुन सोडले. विशेष म्हणजे याबाबतची संस्थेला कोणतीही पूर्वसूचना न देता जलाशय रिकामे झाल्यामुळे जलाशयातील मासोळ्या मरण पावल्या. या जलाशयात अंदाजे १०० ते ५०० ग्रॅम वजनाच्या तीन लाख मासोळ्या तर एक किलो ग्रॅम ते दीड किलो ग्रॅमचे दोन लाख मासोळ्या मारल्या गेल्या. यामुळे संस्थेला व संस्थेच्या सभासदाचे पाच लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीमुळे सदर संस्थेला व संस्था सभासदाला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व नुकसानी करिता सर्वस्व जबाबदार पाटबंधारे विभागाचे वरिष्ठच आहेत, असे मत व्यक्त केले आहे.
या जलाशयातील अशीच घटना सन २००८ मध्ये घडली होती. त्यामुळे सुद्धा याच संस्थेला पाच लाखाच्या नुकसानीचा फटका सहन करावा लागला होता. तेव्हा संस्थेचे अध्यक्ष सुभालाल सराटे, सचिव टिकाराम आचले व संस्थेचे सदस्य शिवचरण वलके, नारायण परतेती, श्रीराम टेकाम, शामलाल उईके, गजानन सराटे, तुलाराम मरस्कोल्हे, कुवरलाल सराटे, रामलाल मरस्कोल्हे, परतेती, देवराज वलके, तिजूलाल वट्टी, रामचंद वलके, तुकाराम बावणे, शंकर मांढरे, मनोज भुमके, गोपीचंद मेश्राम, मधू बावणे या सर्वांनी झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)