दूध,साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST2021-09-15T04:34:32+5:302021-09-15T04:34:32+5:30
गोंदिया : जिल्ह्यात दूध आणि साखर याचे दर जवळजवळ सारखेच आहेत. दूध आणि साखर दोन्ही ४० रुपयाच्या घरात आहेत. ...

दूध,साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?
गोंदिया : जिल्ह्यात दूध आणि साखर याचे दर जवळजवळ सारखेच आहेत. दूध आणि साखर दोन्ही ४० रुपयाच्या घरात आहेत. परंतु दूध आणि साखरपासून तयार होणारी मिठाई मात्र सहा ते दहा पटीने विक्री केली जाते. मिठाई तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कमी किंमतीला असताना सणासुदीच्या काळात मिठाईच्या किमतीत वाढ केली जाते. प्रत्येक मिठाईवर १० ते २० रुपये किलो मागे दर वाढविला जातो. आता गणेशोत्सव असताना आताही या मिठाईची किंमत वाढली आहे. गणेशोत्सव गेल्यानंतर पुन्हा जुनेच रेट सुरू होतील. पुन्हा दिवाळी आल्यावर परिस्थिती जैसे थे होऊन जाईल. दूधाची जास्तीत जास्त किंमत गोंदिया जिल्ह्यात ४० रुपये लिटर आहे. साखरेचीही किंमत कुठे ४० तर कुठे ४२ रुपये प्रति किलो आहे. परंतु दूध आणि साखर मिळून तयार करण्यात आलेल्या मिठाईची किंमत कमीत कमी ३२० रुपये प्रति किलो आहे.
.................................
का वाढले दर
१) मागणी अधिक आणि पुरवठा कमी असला की कोणत्याही वस्तूचे दर वाढतात. परंतु आता सणासुदीचा काळ असल्याने मिठाईवर पाच-दहा रुपये वाढणे स्वाभाविक आहे. परंतु आता मिठाईचा भाव वाढलेला नाही. जुन्याच पध्दतीने मिठाईची किंमत सुरू आहे.
- रामसिंग राजपुरोहीत
..............
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवात मिठाईला पाहिजे तेवढी मागणी नाही. दिवाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. दूध, साखर याच बरोबर मिठाई तयार करण्यासाठी विविध वस्तूंची गरज असते. त्यावर मेहनत असते. त्यामुळे मिठाईचे दर दूध आणि साखरेपेक्षा अधिक असतात.
- जयलालसिंग राजपुरोहीत
...............
दरांवर नियंत्रण कुणाचे?
मिठाईचा दर दुकानदार स्वत:च ठरवितात. मिठाईचा दर कुणी ठरवित नाहीत. हे दर कमी जास्त होतात. परंतु या दरावर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
............
ग्राहक म्हणतात..
आमच्याकडून दूध खरेदी करताना ३० ते ४० रूपये लिटर मागे दिले जाते. परंतु मिठाई घेण्यासाठी दुकानात गेल्यावर ३२० रुपये किलोच्या दराने मिठाई घ्यावी लागते. ग्राहकांचे हे शोषण आहे.
- योगेश खोटेले, डोंगरगाव.
.....
आम्हाला मिठाई खरेदी करायची असेल तर दुकानदार सांगेल त्या भावात खरेदी करावे लागते. भाजीपाला खरेदी करताना भाव करून खरेदी केला जाते परंतु मिठाई घेतांना भाव करूच दिला जात नाही. मागेल तेवढ्या किंमतीत मिठाईचे पैसे मोजावे लागतात.
- अनिल कठाणे, शंभूटोला (आमगाव)
..............
मिठाईचे दर प्रतिकिलो
मिठाई--------सध्याचा दर---- गणेशोत्सवाच्या आधीचा दर
पेढा----------३२०----------------३२०
बर्फी----------३६०---------------३५०
काजू कतली-- ७२०--------------७००
बंगाली मिठाई-३२०-------------३१०