ग्रंथवाचनाने सुसंस्कृत होण्याचा संदेश

By Admin | Updated: February 1, 2016 01:48 IST2016-02-01T01:48:12+5:302016-02-01T01:48:12+5:30

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ गोंदिया...

Message of being educated with textualism | ग्रंथवाचनाने सुसंस्कृत होण्याचा संदेश

ग्रंथवाचनाने सुसंस्कृत होण्याचा संदेश

गोंदिया ग्रंथोत्सव : ‘गं्रथांनी काय दिले’ यावर महाचर्चा
गोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ गोंदिया व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा वाचनालयात तीन दिवशीय ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि.३०) ‘ग्रंथांनी काय दिले’ या विषयावर महाचर्चा झाली. यात ग्रंथांनी दिला सुसंस्कृत होण्याचा संदेश, असा सूर वक्त्यांनी काढला.
सदर महाचर्चेत नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह डॉ. गजानन कोठेवार, नागपूर गांधी स्मारक वाचनालयचे सचिव सुनील पाटील, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील प्रा. तोषिका पटले, नमाद महाविद्यालयाचे प्रा. एस.बी. रामटेके, डिलेश्वरी टेंभरे, तरूण पुंडे यांनी सहभाग घेतला.
डॉ. कोठेवार म्हणाले, ग्रंथ मनुष्याला जीवन जगण्याचे बळ देतात. ग्रंथांमुळे जीवनाचा पाया भक्कम होतो. तर ग्रंथ वाचनाने मनुष्य सुसंस्कृत जीवन जगण्याची कला आत्मसात करतो. मनुष्य परिपक्व होतो व त्याला संघर्ष करण्याची शक्ती प्राप्त होते. भूतकाळाचा विचार न करता आपले ध्येय गाठण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची ताकत ग्रंथ देतात. म्हणूनच उपस्थित युवक-युवतींना डॉ. कोठेवार यांनी साने गुरूजींच्या आईने त्यांना दिलेला ‘बेटा शिक व मोठा हो,’ असा संदेश अत्यंत कळकळीने दिला.
सुनील पाटील यांनी अभ्यासासाठी केलेले वाचन व ग्रंथवाचनातील वाचन यातील फरक सांगितला. परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेले वाचन तात्पुरते ठरते. तर ग्रंथवाचनाने जीवनाला दिशा मिळते. ग्रंथांमुळे महापुरुष घडले व महापुरूषांनी ग्रंथातील दिलेल्या संदेशामुळे आपण घडतो, असे मत व्यक्त केले. प्रा. तोषिका पटले म्हणाल्या, जीवनात ग्रंथ सर्वत्र आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करण्यासाठी त्या मार्गावर वळले पाहिजे. लोकशाही सुदृढ करण्याचे काम ग्रंथ करतात. आपण कितीही आधुनिक झालो, तंत्रज्ञानाने अद्यावत झालो तरी ग्रंथांची महत्ता आपण नाकारु शकत नाही. संतुुलित समाज निर्माण करण्याचे कार्य ग्रंथ करतात, असे त्या म्हणाल्या.
प्रा.एस.बी. रामटेके यांनी मनुष्याने मनुष्यसारखे वागावे, अशी शिकवण ग्रंथ प्रदान करतात असे सांगून ग्रंथातील एका संदेशात मनुष्याचे अवघे जीवन बदलवून टाकण्याची क्षमता असते, असे सांगितले. महाचर्चेत डिलेश्वरी टेंभरे व तरूण पुंडे यांनीही ग्रंथांची महत्ता सांगितली. ग्रंथ मनुष्याला अखेरपर्यंत साथ देतात. जीवनात संवेदना, तरलता, प्रगती, उत्कर्ष सर्व काही ग्रंथ प्रदान करतात. ग्रंथांमुळे जगण्याची कला समजते, असे सांगितले.
संचालन विद्या ठाकरे यांनी केले. या वेळी महाविद्यालयीन युवक-युवती, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Message of being educated with textualism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.