लोकसहभागातून लावलेली रोपटी वनरक्षकाने उपटून फेकली
By Admin | Updated: September 12, 2016 00:25 IST2016-09-12T00:25:02+5:302016-09-12T00:25:02+5:30
कोहमारा सहवनक्षेत्रातील वनरक्षकाने गावकऱ्यांनी लावलेली झाडे उपटून फेकणे महागात पडू शकते.

लोकसहभागातून लावलेली रोपटी वनरक्षकाने उपटून फेकली
अतिक्रमणही वाढले : ‘मालसुतो’ अभियान राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा
सडक-अर्जुनी : कोहमारा सहवनक्षेत्रातील वनरक्षकाने गावकऱ्यांनी लावलेली झाडे उपटून फेकणे महागात पडू शकते. त्या वनरक्षकाला निलंबित करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनरक्षक शिवा तांडेकर यांनी दबंगगिरी करुन वनसमिती व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून लावलेलीे सागवान, शिसम, करंजी आदी झाडे उपटून फेकण्याचा प्रकार वडेगाव येथील गट नं. ५१७ मध्ये घडला आहे.
शिवा तांडेकर हे रुजू होऊन तीन वर्षे झाले. तांडेकर यांच्या आशीर्वादाने जवळ-जवळ २५ एकर जमीन अतिक्रमण काढले आहे. अतिक्रमण काढणाऱ्यांकडून काही आर्थिक भ्रष्टाचार केल्याची चर्चा तालुक्यात आहे. जर तत्पर वनरक्षक राहिले असते तर २५ एकराच्या वनजमिनीत अतिक्रमण झालेच नसते. त्यात वनरक्षकाने ‘मालसुतो’ अभियान राबवल्याचे दिसत आहे.
पटाची दानच्या गट नं. ५१७ मध्ये वनसमिती व गावकऱ्यांनी अतिक्रमण न झालेल्या जमिनीत कुणी अतिक्रमण करू नये व पर्यावरणाच्या शतकोटी वृक्ष लागवडीला सहकार्य करून झाडे लावण्याचा संकल्प केला. लोकसहभागातून झाडे लावण्यात आली. वनसमितीचे अध्यक्ष नाजूक चुटे, दक्षता समितीचे अध्यक्ष राजेश मुनिश्वर, उपसरपंच राजेंद्र खोटेले, शिशुपाल हत्तीमारे आदी गावकऱ्यांना न विचारता वनरक्षक तांडेकर, वनमजूर बनकर व त्यांचा एक सहकारी यांनी जोशात येऊन झाडे उफटून फेकली.
सदर घटनेची माहिती कोहमाराचे क्षेत्र सहायक सुनील खांडेकर यांना देताच त्यांनी वडेगाव ग्रामपंचायत गाठून गावकऱ्यांची समजूत घातली. वनसमिती व गावकऱ्यांनी त्या वनरक्षकाला वनमजुरावर कारवाई करण्याची मागणी केली. दक्षता समितीचे अध्यक्ष राजेश मुनिश्वर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, गोंदियाचे उपविभागीय वन अधिकारी यु.टी. बिसेन यांना दूरध्वनीवर घटनेची माहिती देऊन सदर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
कर्मचाऱ्यांचे निलंबन न केल्यास मुख्य वनसरंक्षक वनवृत्त प्रादेशिक नागपूर यांना लेखी तक्रार करणार आहेत. सदर कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरण वनकर्मचाऱ्यांच्या अंगलट येऊ नये यासाठी वरिष्ठाचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शतकोटी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जागा मिळेल तिथे वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबिले आहे. पण लोकसहभागातून लावलेले झाडे उपटून फेकणाऱ्या वनकर्मचाऱ्याला हे का कळले नाही, हा संशोधनाचा विषय आहे.
वडेगावात मात्र जागा मिळेल तिथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न वनरक्षकांच्या आशीर्वादाने होत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी काही रक्कमही मोजून द्यावी लागल्याची चर्चा अतिक्रमण काढणाऱ्यांकडून होत आहे.(शहर प्रतिनिधी)