महावितरणला ८२ लाखांचा फटका

By Admin | Updated: June 20, 2016 01:29 IST2016-06-20T01:29:10+5:302016-06-20T01:29:10+5:30

एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे.

MahaVitaran hit 82 lakhs | महावितरणला ८२ लाखांचा फटका

महावितरणला ८२ लाखांचा फटका

गोंदिया : एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीही सुटली नसून या अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्यामुळे महावितरणला सुमारे ८२.१३ लाखांचा फटका बसला आहे.
यंदा उन्हाने चांगलेच चटके दिले व त्यावर अवकाळी पावसाने थंडावा दिला. एप्रिल व मे महिन्यातील या उन्हासोबतच अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने जिल्ह्यातील वातावरण बदलून टाकले होते. पाऊस व तुफानामुळे या दोन महिन्यांत पावसाळा सुरू झाल्याचाही अनूभव आला. मात्र हा अवकाळी पाऊस जेवढा नुकसानकारक ठरला, तेवढेच नुकसान वादळीवाऱ्याने केले. या पाऊस व वादळीवाऱ्यामुळे कोठे झाडे पडली, तर कोठे घरांची पडझड झाली. तर पावसाने पिकांची नासाडी करून सोडली.
अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. एप्रिल व मे महिन्यातील या वादळीवाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे ८२.१३ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यात एप्रिल महिन्यात १६.९० लाखांचे नुकसान झाले असून मे महिन्यात ६५.२३ लाखांचे नुकसान झाले आहे. वादळीवाऱ्यामुळे कोठे विज पोल पडले तर कोठे वाहिन्या तुटल्या. विद्युत रोहित्रांतही बिघाड आला व अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला होता. या नुकसानीमुळे कंपनीची चांगलीच पंचाईत झाली असून दुरूस्तीसाठी कसरत सुरूच आहे. (शहर प्रतिनिधी)

२४ विद्युत रोहित्रांत बिघाड
वादळीवाऱ्याच्या कहरामुळे पोल व वाहिन्या तुटल्या असतानाच विद्युत रोहित्रही यापासून सुटले नाहीत. यामध्ये एप्रिल महिन्यात गोंदिया विभागात ९ विद्युत रोहित्रांत बिघाड आला तर मे महिन्यात एकूण १५ रोहित्रांत बिघाड आला असून त्यात गोंदिया विभागातील १२ तर देवरी विभागातील ३ रोहित्र आहेत. अशाप्रकारे रोहित्रांमधील बिघाडामुळे कंपनीला २२.४० लाखांचे नुकसान झाले आहे.

जून महिन्यातही नुकसानी सुरूच
एप्रिल व मे महिन्यात झालेली नुकसानी तेथेच संपली नसून जून महिन्यातही नुकसानीचे हे सत्र सुरूच असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नुकसानीमुळे महावितरण त्रस्त झाले असतानाच देखभाल दुरूस्तीची कामे वाढली आहेत. दुरूस्ती झाल्यानंतर पुन्हा तुटफूट होत असल्याने दुरूस्तीसाठी कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.

७७६ पोल पडले
वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यातील ७७६ पोल पडले आहेत. यात १७९ उच्चदाब व ५९७ लघुदाब पोल असून एप्रिल महिन्यात ५६ उच्चदाब व १६३ लघुदाब व मे महिन्यात १२३ उच्चदाब व ४३४ लघुदाब पोल पडले आहेत. विभागनिहाय बघितल्यास, एप्रिल महिन्यात गोंदिया विभागात ३१ उच्चदाब व ८६ लघुदाब तर देवरी विभागात २५ उच्चदाब व ७७ लघुदाब पोल पडले आहेत. तसेच मे महिन्यात गोंदिया विभागात ७४ उच्चदाब व १६७ लघुदाब तर देवरी विभागात ४९ उच्चदाब व २६७ लघुदाब पोल पडले आहेत. अशाप्रकारे पोल तुटल्याने महाविरणला सुमारे ३९.४४ लाखांचे नुकसान झाले आहे.
१३४ किमी. वाहिनी तुटली
पोल तुटले असतानाच जिल्ह्यात १३४.२२ किमी. वीज वाहिन्या तुटल्या आहेत. यात १६.९ किमी. उच्चदाब व ११७.३२ किमी. लघुदाब वाहिन्या असून एप्रिल महिन्यात ३.७८ किमी. उच्चदाब व ९.२ किमी. लघुदाब तर मे महिन्यात १३.१२ किमी. उच्चदाब व ९१.२२ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. विभागनिहाय बघितल्यास, एप्रिल महिन्यात गोंदिया विभागात १.६८ किमी. उच्चदाब व २.४२ किमी. लघुदाब तर देवरी विभागात २.१ किमी. उच्चदाब व ६.७८ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. तसेच मे महिन्यात ८.१० किमी. उच्चदाब व २३.१६ किमी. लघुदाब तर देवरी विभागात ५.०२ किमी. उच्चदाब व ६८.०६ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. यातून एकूण सुमारे २०.२७ लाखांचे नुकसान झाले आहे.

Web Title: MahaVitaran hit 82 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.