वजन काट्यांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट
By Admin | Updated: September 15, 2015 04:30 IST2015-09-15T04:30:27+5:302015-09-15T04:30:27+5:30
ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाचे वजन तंतोतंत असावे यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावण्यात आले. परंतु

वजन काट्यांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट
रावणवाडी : ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाचे वजन तंतोतंत असावे यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावण्यात आले. परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षपणामुळे त्यातही ग्राहकांची सर्रासपणे लूट केली जात आहे.
‘जसा दाम तसा माल’ अशी अपेक्षा ग्राहकांची असते. पण बाजार पेठेतील दुकानदार वापरत असलेल्या वजन काट्यांनी ग्राहकांची ही अपेक्षा निराश करणारी ठरत आहे. मालाची योग्य किंमत देवूनही कमी वजनाचे माल दुकानदाराकडून विकत घ्यावे लागते. अशात तक्रार करावी तर कुठे, असा प्रश्न ग्राहकांसमोर उपस्थित झाला आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातही प्रत्येक दिवशी बाजार भरत असतो. खेडेगावातील लोक किफायतशीर भावाने आवश्यक वस्तू मिळतील, अशी अपेक्षा बाळगून वस्तू खरेदीसाठी बाजारात येतात. मात्र बाजारात दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांकडे परवाना असलेले वजन काटे उपलब्ध राहत नसल्यामुळे ग्राहकांची लूट होत आहे. बऱ्याच विक्रेत्यांकडे १०, २० व ५० ग्रॅमचे वजनही उपलब्ध नसतात. त्या आकाराचे दगड किंवा अन्य वस्तूंचा वजन म्हणून सर्रासपणे वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
शहरी व ग्रामीण दोन्ही भागात वजन काट्यांना पासिंग करवून घेण्याकरिता प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी शिबिर घेतले जातात. मात्र आठवडी बाजारातील दुकानदारांकडे पासिंग केलेले वजन काटे आढळत नाहीत. त्यामुळे दुकानदारांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आठवडी बाजारात योग्य दरात कमी वजनाच्या वस्तू विकत घ्यावे लागतात. हा प्रकार माहीत असूनही कोणताही ग्राहक याबाबत तक्रार करताना दिसून येत नाही. त्यामुळेच वजन काटे प्रमाणित नसलेल्या दुकानदारांचे फावते आहे. ग्राहकांना योग्य भावात योग्य माल मिळण्यासाठी वजनमाप निरीक्षकांनी अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र बाजारात असा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडे या विभागाकडून दुर्लक्ष का करण्यात येते, असा प्रश्न जागरूक ग्राहकांकडून विचारला जात आहे.
सदर प्रकार वजनमाप विभागाला माहीत असला तरी दुकानदारांवर कारवाई केली जात नाही. तसेच याकडे सदर विभाग हेतूपुरस्परपणे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. वजन माप प्रमाणित नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई केल्यास ग्राहकांची होणारी लूट थांबू शकेल, अशी अपेक्षा ग्राहकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)