चिमुकल्यांचा आहार निकृष्ट
By Admin | Updated: September 14, 2015 01:38 IST2015-09-14T01:38:23+5:302015-09-14T01:38:23+5:30
बोळदे-कवठा येथील अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार दिले जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण होईल की त्यांची वाटचाल कुपोषणाच्या दिशेने होईल, अशी समस्या पुढे आहे.

चिमुकल्यांचा आहार निकृष्ट
पालकांमध्ये रोष : अनियंत्रित कारभारामुळे अंगणवाडीत कर्मचाऱ्यांची मनमर्जी
बाराभाटी : बोळदे-कवठा येथील अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार दिले जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण होईल की त्यांची वाटचाल कुपोषणाच्या दिशेने होईल, अशी समस्या पुढे आहे. या प्रकारामुळे गावकरी चिंतीत असून त्यांच्यामध्ये रोष पसरला आहे.
४ सप्टेंबर रोजी बालकांना अंड्यांचा आहार देण्यात आला. ते अत्यंत निकृष्ट होते. ते काही बालकांनी खाण्याचा प्रयत्नही केला. ही बाब पालकांना कळताच त्यांची याची तक्रार वरिष्ठांकडे केली. मात्र कारवाई थंडबस्त्यात आहे. साधी चौकशीसुद्धा अद्याप करण्यात आली नाही. अशा आहारामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो.
सदर अंगणवाडी केंद्राचे परिसर अस्वच्छ आहे. त्या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका नेहमीच संभवतो. अंड्यांचे वरील सोल, केरकचरा व गढूळ पाणी परिसरात पसरले असते. असा प्रकार अंगणवाडी सेविका व कर्मचारी करीत आहेत. याकडे कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझरचे लक्ष नाही. सुपरवायझरसुद्धा कधीही या अंगणवाडीला भेटी देत नाही. त्यामुळे स्वत:च्या मनमर्जीने अंगणवाडी सेविका बोळदे-कवठा येथील अंगणवाडी चालविते व अरेरावीपणा करते, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. येथे बालकांच्या खिचडीमध्ये दाळ वापरली जात नाही. ती खिचडी न दिसता पाणीच दिसते. सेविका ही नियमित येत नसून सभेचा बहाणा सांगून खोळंबा करते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. याबाबत सदर अंगणवाडी सेविकेला विचारणा केली असता दुसऱ्या अंगणवाडीच्या सेविका असभ्य वर्तन करून टाळाटाळीची उत्तरे देतात. आपण काय बोलतो याचेच भान त्यांना राहत नाही तर मुले काय शिकणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
सर्वच अंगणवाडी केंद्रात अनेक समस्या असून त्या स्वत: अंगणवाडी सेविकांनीच निर्माण केल्या आहेत. बालकांना परिपूर्ण आहार मिळत नाही. खोटे बिल दाखवून शासनाचा पैसा लाटला जात आहे. बोगस बिले तयार करण्यात या अंगणवाडी सेविका अगदी कुशल असल्याचे बोलले जाते. संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळेच असे प्रकार घडत असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गोंदिया, पंचायत समितीचे सभापती व खंडविकास अधिकारी व भ्रष्टाचार निर्मूलन समिती अर्जुनी-मोरगाव यांना लेखी पत्र देवून नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)