शाळेतील विद्यार्थ्यांना वन व वन्यजीव संरक्षणाचे धडे
By Admin | Updated: May 15, 2014 01:31 IST2014-05-15T01:31:38+5:302014-05-15T01:31:38+5:30
लोक सहभाग व लोक चळवळीच्या माध्यमातून वन व वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आता शाळेतील

शाळेतील विद्यार्थ्यांना वन व वन्यजीव संरक्षणाचे धडे
सातपुडा फाऊंडेशनचा उपक्रम : व्याघ्र प्रकल्पांतर्गत गावातील १२ शाळांचा समावेश
गोंदिया : लोक सहभाग व लोक चळवळीच्या माध्यमातून वन व वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आता शाळेतील विद्यार्थ्यांना वन व वन्यजीव संरक्षणाचे धडे दिले जात आहे. सातपुडा फाऊंडेशनने हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत १२ दुर्गम गावांतील शाळांचा यात समावेश असून येथील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षणाचे धडे दिले जात आहे.
सातपुडा फाऊंडेशन मागील १३ वर्षांपासून मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांगामधील वने व वन्यजीव संरक्षण या विषयाचा अभ्यास करून विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहे. लोक सहभागी व लोक चळवळीच्यामाध्यमातून हे प्रश्न सोडविण्यावर फाऊंडेशनचा भर राहिला असून यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. वने व वन्यजीव संरक्षण आज काळाची गरज झाले असून लोकांत जागृती व त्यांच्या सहभागा शिवाय हे कार्य अपूर्णअसल्याची बाब हेरून फाऊंडेशनने आता पर्यावरण शिक्षणातून वन्यजीव संरक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी फाऊंडेशनने मध्य भारतातील चार व्याघ्र प्रकल्पांमधील दुर्गम गावांचा यात समावेश केला आहे. जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा राखीव क्षेत्रा लगत मंगेझरी येथे यासाठी फाऊंडेशनने कार्यालय स्थापित केले आहे. तर जिल्ह्यात कु र्हाडी, बोळूंदा, मंगेझरी, जिंदाटोला, गोविंदटोला, कोडेबर्रा, पिंडकेपार, सुकळी डाकराम, बेरडीपार, भजेपार, वडेगाव व कोडेलोहारा येथील शाळांत हा उपक्रम राबविला जात आहे.
यांतर्गत फाउंडेशनचे फिरते निसर्ग शिक्षण वाहन परिसरात भेट देऊन प्रत्येक महिन्यात सहा शाळेतील विद्यार्थी व दोन गावांतील लोकांना पर्यावरण व वन्यजीव या विषयावर आधारीत चित्रपट दाखविले जात आहे. यातून मानव जीवनात निसर्ग व वन्यजीव यांचे महत्व विद्यार्थी व गावकर्यांना पटवून त्यांच्या सहभागातून निसर्ग व वन्यजीव यांच्या संरक्षणात सहभाग घेऊन संरक्षणाची कामे केली जात आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना निसर्ग जंगलातच शिकवावा व त्यांच्या घटकांची ओळख व्हावी याकरिता निसर्ग सहल, निसर्ग शिबीर, परिसर भेट, निसर्ग खेळ द्वारे विद्यार्थ्यांना जंगलात नेऊन शिक्षण दिले जात आहे. तसेच शाळा व गावच्या परिसरात वृक्षारोपण, किचन गार्डन, पक्षांसाठी कृत्रिम घरटे, पाणपोई, बिज संकलन सारखे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जातात.
यातून लहानपनापासूनच मुलांच्या मनात निसर्ग व वन्यजीव याविषयी आपुलकी निर्माण होऊन ते आयुष्यभर त्यांचे संरक्षण व संवर्धन करीत राहणार असे फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे, नागपूर कार्यालयाचे संचालक गिरी व्यंकटेशन व मंगेझरी कार्यालयाचे संरक्षण अधिकारी मुकूंद धुर्वे सांगतात.
(शहर प्रतिनिधी)