जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ
By Admin | Updated: January 7, 2015 22:55 IST2015-01-07T22:55:00+5:302015-01-07T22:55:00+5:30
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित स्वरुपात समाधान शिबिर सोमवारी सडक अर्जुनी येथे पार पडले. सदर कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते

जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ
गोंदिया : सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित स्वरुपात समाधान शिबिर सोमवारी सडक अर्जुनी येथे पार पडले. सदर कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ करुन विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमामधील ठिंबक सिंचन संच पूर्व मंजुरीचे आदेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
जलयुक्त शिवार अभियानाद्वारे विविध स्त्रोतांमध्ये साठवणूक होणाऱ्या पाणाचा वापर सुक्ष्म सिंचन पद्धतीने करावे व गरजेनुसारच पाण्याचा वापर करण्यात यावा. त्यामुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्राचे सिंचन करता येईल. यामुळे पिकाची उत्पादकता वाढून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. याकरिता ठिंबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन ना. बडोले यांनी केले.
ते पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान २०१९ पर्यंत विविध प्रकारची जलसंधारणाची कामे एकात्मिक पद्धतीने राबवून ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र’ याकरिता टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व शेतकरी, शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था, जिल्ह्यातील कारखानदार यांनी योग्य ते सहकार्य करुन अभियान यशस्वीपणे राबविण्याचे सर्व उपस्थिताना आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे उद्देश व यामध्ये घेण्यात येणाऱ्या कामांची व योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, सभापती, उपसभापती पं.स. सडक/अर्जुनी, जि.प. व पं.स. सदस्य, सडक-अर्जुनीचे सरपंच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, देवरीचे उपविभागीय अधिकारी सोनवाने, सडक -अर्जुनीचे तहसीलदार उईके, गट विकास अधिकारी धांडे, तालुका कृषी अधिकारी विजय पेशट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)