परिश्रम शेतकऱ्यांचे; मर्जी व्यापाऱ्यांची
By Admin | Updated: December 1, 2014 22:57 IST2014-12-01T22:57:06+5:302014-12-01T22:57:06+5:30
संकरित व सुधारित बियाण्यांच्या नावावर वाटेल त्या किमतीत बियाणे विकून शेतकऱ्यांना लुबाळणे, त्यानंतर खत विक्री व किटकनाशक औषधे विक्री व शेवटी धान खरेदी पडक्या भावाने करीत अगदी

परिश्रम शेतकऱ्यांचे; मर्जी व्यापाऱ्यांची
विजय मानकर - सालेकसा
संकरित व सुधारित बियाण्यांच्या नावावर वाटेल त्या किमतीत बियाणे विकून शेतकऱ्यांना लुबाळणे, त्यानंतर खत विक्री व किटकनाशक औषधे विक्री व शेवटी धान खरेदी पडक्या भावाने करीत अगदी सुरुवातीपासून तर सुगीच्या दिवसापर्यंत भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण व्यापारी वर्ग करीत आहे.
हा शोषण असह्य होवूनही शेतकरी नेहमी सर्वकाही सहन करीत आहे. त्यामुळे शोषित शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहातून कधीच बाहेर निघत नाही. अर्थात परिश्रम शेतकरी करतो. मात्र त्यावर मर्जी व्यापाऱ्यांची चालते. शेतकऱ्यांची ही दैनावस्था वर्षानुवर्षे चालत राहिली आणि आजसुद्धा सुरू आहे.
पेरणीपूर्व मशागतीपासून तर धान कापणी आणि मळणीपर्यंत धान उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुले, वृद्ध आई-वडिलांसह प्रत्येक सदस्याची कोणती न कोणती मदत घेत सतत मेहनत करतो. पीक चांगले यावे म्हणून दिवसरात्र एक करणे, पहाटे लवकर उठणे, रात्री उशिरा झोपणे हा नित्यक्रम चालवितो. ऊन-पावसात आपल्या प्रकृतीची चिंता न करता दिवसभर खपतो आणि राबतो. परंतु शेवटी शेतमालाच्या आर्थिक व्यवहारासंबंधी आपल्या मर्जीनुसार कोणतेही कार्य करु शकत नाही. साऱ्या देशाचे पोट भरण्यासाठी अन्न निर्माण करणारा धान उत्पादक शेतकरी आपला पोटसुद्धा आपल्या मर्जीनुसार भरु शकत नाही, हे या शेतकऱ्यांचे मोठेच दुर्दैव आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला बियाणे पेरणीपासून वेगवेगळ्या स्वरुपात सुरुवात होते. पेरणीसाठी धान बियाणे खरेदी करायला गेल्यास सुधारित बियाणे खरेदी करताना ठोकळ स्वरुपाचे बियाणे साधारणत: ५० रूपयांपासून तर १०० रुपये प्रति किलोपर्यंत खरेदी करावे लागते. तसेच बारीक प्रजातीचे धान १५० रूपये प्रतिकिलोपर्यंत खरेदी करावे लागते. जर शेतकऱ्याला संकरित धान बियाणे खरेदी करायचे असल्यास ३०० पासून तर ५०० रूपये प्रति किलोप्रमाणे किमत मोजावी लागते. कमीत कमी जागेवर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या मोहात शेतकरी ती किमत देवून संकरित बियाणे खरेदी करतो. परंतु अनेकवेळा संकरित बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूकसुद्धा होते. याची तक्रार शेतकरी त्या व्यापाऱ्यांकडे करू शकत नाही किंवा नकली संकरित बियाणे परत करणे शक्य होत नाही. बियाणे खरेदी करण्यात झालेला तोटा सहन करावाच लागतो. बियाणे बोगस निघाल्यावर त्यांची योग्यप्रकारे नर्सरी तयार होत नाही. त्यामुळे पुन्हा पैसे खर्च करुन नवीन बियाणे खरेदी करावे लागतात व दुबार पेरणी करावी लागते. आता तर अनेक व्यापारी सुधारित धान बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची व्यवस्थित पॅकिंग करुन शेतकऱ्यांना मुर्ख बनविण्याचा धंदा करीत आहेत. बियाणे खरेदीत शोषण केल्यावर खत खरेदीमध्ये शेतकऱ्यांना एमआरपी किमतीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. ऐवढेच नाही तर बोगस व भेसळ रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर कृषी केंद्रावर विक्री होत असून उधारी स्वरुपात खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी मुर्ख बनविण्याची कामे व्यापाऱ्यांकडून केली जात आहेत. युरिया खतावर शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. परंतु अनुदानाचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कधीच लाभ मिळत नाही. युरियाच्या तुटवड्याच्या नावावर मर्जीप्रमाणे दर लावून शेतकऱ्यांना खत विक्री केली जाते. धान पिकाला निश्चित वेळेवर युरिया दिले नाही तर पिकांवर परिणाम होतो, असी समज धान उत्पादक शेतकऱ्यांना असते. त्यामुळे किमतीची पर्वा न करता तो खत खरेदीला महत्त्व देतो. परंतु या संधीचा गैरफायदा घेत व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात. उधारी खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना तर वाटेल त्या दरात खते दिली जातात. मात्र उधारी वसूल करताना व्याज लावले जाते. खत खरेदीनंतर किटकनाशक खरेदीतसुद्धा अशीच लुबाडणूक केली जाते.