खरिपाची नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे

By Admin | Updated: September 21, 2015 01:39 IST2015-09-21T01:39:50+5:302015-09-21T01:39:50+5:30

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Khariipa neglected money for 74 paise | खरिपाची नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे

खरिपाची नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे

लोकमत विशेष
देवानंद नंदेश्वर  भंडारा
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ७४ पैसे घोषित केली आहे. शेतकरी परतीच्या पावसामुळे सुखावला असला तरी किडींचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याचे संकट उभे आहे, असे असताना जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या पैसेवारीवर शेतकऱ्यांनी संशय घेतला आहे.
मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या पावसाने आगामी पीक वाढीसाठी पाठ फिरविली. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पिकांसाठी अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. १ लाख ८२ हजार ६७० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९१ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९० टक्के म्हणजेच १ लक्ष ६३ हजार ८८३ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली. आता हे पीक डौलाने उभे आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमीच आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व किडींच्या प्रादुर्भावाने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.
जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ७४ पैसे दर्शविली आहे. ही सर्व गावे ६७ पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ६७ पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४६ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६९ गावांची पैसेवारी ७२ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ७७ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७२ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ७२ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७१ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७६ पैसे दाखविण्यात आली आहे.
१० गावे अकृषक पाण्याखाली पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. यामध्ये पवनी तालुक्यातील सर्व १० गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८८९ एकूण गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत.

१५ दिवसांपूर्वीच पैसेवारी जाहीर !
राज्य शासनाच्या ४ मार्च १९८९ च्या ठरावानुसार नागपूर विभागाची खरीप हंगाम नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी जाहीर होते. यावर्षी केंद्र शासनाला माहिती देण्याच्या अनुषंगाने नागपूर विभागाची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरऐवजी १५ सप्टेंबर जाहिर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार पैसेवारी घोषित करण्यात आली आहे.
निकष बदलले
४यापुर्वी ५० पैसेच्या आत व ५० पैसेपेक्षा अधिक अशी पैसेवारीची पध्दत होती. यावर्षी सुधारीत पध्दतीचा अवलंब करण्यात आला. या पध्दतीनुसार मागील पाच वर्षांतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण समजून ६७ पैसेपेक्षा कमी व ६७ पैसेपेक्षा अधिक यानुसार पैसेवारी जाहिर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

Web Title: Khariipa neglected money for 74 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.