कचारगड गुफेत स्वच्छता अभियान
By Admin | Updated: February 6, 2016 01:49 IST2016-02-06T01:49:18+5:302016-02-06T01:49:18+5:30
कचारगड येथे कोयापुनेम महोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यानिमित्त आलेले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी....

कचारगड गुफेत स्वच्छता अभियान
जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : स्वच्छतेबद्दल गंभीरता दाखवत स्वत: घेतला सहभाग
सालेकसा : कचारगड येथे कोयापुनेम महोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यानिमित्त आलेले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परतीचा प्रवास सुरू करण्यापुर्वी गुफा परिसरात स्वच्छता मोहिम राबवून एक नवीन उदाहरण सादर केले. पहिल्यांदाच घडलेल्या या प्रकाराची मात्र सर्वत्र चर्चा व कौतूक केले जात आहे.
बुधवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि इतर वरिष्ठ अधिकारी कचारगडला भेट देण्यासाठी धनेगाव येथे पोहोचले. धनेगाव येथील यात्रेच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कचारगड देवस्थान व गुफेला भेट दिली व पाहणी केली. शेवटच्या टप्यात मोठ्या गुफेत त्यांनी प्रवेश केला व मोठ्या कुतुहलाने पाहणी केली.
महाकाय गुफा पाडून तसेच आतमध्ये पाण्याचे स्त्रोत व वरुन प्रकाश टाकणारा बोगदा बघून आश्चर्यचकित झाले. त्याच ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली व विषयानुरुप आपले विचार मांडले. तसेच काही विषयांवर योग्य सल्ला दिला आणि परतीचा प्रवास सुरु करायला निघू लागले. त्यांच्याबोरब सर्व सहकारी घाई ने बाहेर निघायला लागले. परंतु एवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गुफेत इकडे-तिकडे पडलेल्या प्लास्टीक पिशव्या उचललायला सुरुवात केली व चला आपण या ठिकाणाला स्वच्छ करु असे आवाहन केले.
काही कर्मचारी बघ्याच्या भुमिकेत राहिले परंतु काही त्यांची साथ देत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यात उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, तहसीलदार प्रशांत सांगळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे आदिंनी घाणेरड्या पिशव्या, गुटख्याच्या पिशव्या व इतर घाण पसरवणारा कचरा उचलला. जिल्हाधिकारी मोठ्या गुफा परिसरात आत आणि बाहेरपासून खाली उतरेपर्यंत सतत परिसर स्वच्छ करीत राहिले. त्यानंतर वर एका ठिकाणी व खाली एका ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लावून त्याला आग लावाण्यात आली. कचारगड परिसरात ही अभिनव मोहिम राबविणारे ते पहिलेच अधिकारी ठरले. या दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता स्वच्छता मोहिम हा त्यांचा आवडता विषय असल्याचे त्यांनी सांगितले. यापुर्वी येथे अनेक अधिकारी, पदाधिकारी येऊन गेले. त्यात मंत्री, अमदार, जिल्हाधिकारी, सीईओ इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश राहीला. परंतु येथे स्वच्छता मोहिम राबविल्याबद्दल विचार कोणाच्याच डोक्यात आला नाही. किंवा घाण कचऱ्याला हाताने उचण्याची हिम्मत कोणी दाखविली नाही. या मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मिशनचा मोठा संदेश दिला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. (तालुका प्रतिनिधी)
सहजता आणि स्वयंस्फूर्तीने केले प्रभावित
जिल्हाधिकारी म्हटले की त्यांच्या पदाप्रमाणे त्यांचे सहकारी मदतीला तत्पर असतात. परंतु डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सहज आणि स्वयंस्फूर्तपणा बघून सर्व प्रभावित होऊन गेले. कचारगड गुफेत जाण्यासाठी पहाड चढत असताना त्यांनी खडतर चढावाचा मार्ग सहज चढला. त्यांचे काही सहकारी मधात थकून बसले. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मुळीच थकवा दिसून आला नाही. स्वच्छता राबवून स्वत: खाली वाहत असलेल्या झऱ्याच्या पाण्याने त्यांनी हात-तोंड धुवून घेतले. त्यानंतर हाजराफॉल परिसरात येऊन पाहणी केल्यानंतर धबधबा असलेला उंच पहाड स्फुर्तीने चढत एखाद्या पर्वतारोहीप्रमाणे कसब दाखविला.